

Rohit Sharma ODI retirement : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. या अनुभवी सलामीवीराला पहिल्या दोन एकदिवसीय (ODI) सामन्यांमध्ये अनुक्रमे ११ आणि २६ धावाच करता आल्या आहेत. या वर्षात खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये ३०.१२ च्या सरासरीने रोहितने केवळ २४१ धावा केल्या असून, ७९ ही त्याची या वर्षातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. त्यातच आता रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या या चर्चांवर भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी शनिवारी (१८ जुलै) एक मोठे वक्तव्य केले आहे. "रोहित शर्मा जेव्हा कधी निवृत्त होईल, तेव्हा दुःखी होण्याऐवजी त्याचा उत्सव साजरा केला पाहिजे," असे कपिल देव म्हणाले.
वृत्तसंस्था 'एएनआय'शी बोलताना कपिल देव म्हणाले, "आपण सर्वांनी आनंदी असायला हवे, निराश का व्हायचे? रोहितने इतक्या वर्षांत क्रिकेट चाहत्यांना भरभरून आनंद दिला आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस निरोप घ्यावाच लागतो. सुनील गावस्कर निवृत्त झाले त्यानंतर राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकरही निवृत्त झाला. प्रत्येकालाच निवृत्तीच्या प्रक्रियेतून जावे लागते."
चाहत्यांनी रोहितच्या जाण्यावर दुःखी होण्याऐवजी त्याने मिळवलेल्या यशाचा आणि योगदानाचा गौरव केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत तो जेव्हा क्रिकेटला अलविदा करेल, तेव्हा आपण त्याच्या कारकिर्दीचा उत्सव साजरा केला पाहिजे. त्याने केवळ देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला किती आनंद आणि मनोरंजन दिले आहे! होय, त्याला एक दिवस थांबायचेच आहे. मला आशा आहे की, तो हा निर्णय घेत असेल, तर त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात शतक (१०० धावा) ठोकून दिमाखात निरोप घ्यावा," अशी इच्छाही कपिल देव यांनी व्यक्त केली.
रोहित शर्माने २३ जून २००७ रोजी आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो यापूर्वीच टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत रोहित फॉर्मशी झगडत असल्याने त्याच्या वनडे निवृत्तीच्या अफवा तीव्र झाल्या आहेत. त्यातच, निवडकर्ते आता तरुण फलंदाज यशस्वी जयस्वालला अधिक संधी देण्याचा विचार करत असल्याने रोहितवर संघ व्यवस्थापन पुढे विचार करणार नाही, अशी चर्चा आहे. इंग्लंडमधील ऐतिहासिक 'लॉर्ड्स' मैदान हे रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय फलंदाजांचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकाही भारतीय फलंदाजाला या ऐतिहासिक स्टेडियमवर शतक झळकावता आलेले नाही. लॉर्ड्सवर वनडेत भारतीयाकडून नोंदवली गेलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर आहे.