

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने केकेआर व्यवस्थापनाला एक धाडसी सल्ला दिला आहे. ‘‘रिंकू सिंहला या हंगामाच्या मध्यावरच कर्णधार करावे किंवा किमान उपकर्णधारपदाची जबाबदारी देऊन भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करावे,’’ असे मत कैफने व्यक्त केले आहे. रिंकूमध्ये नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असून तो या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचेही त्याने नमूद केले.
मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब चॅनेलवर रिंकूच्या गुणवत्तेवर भाष्य करताना म्हटले की, ‘‘रिंकू सिंह हा केवळ मर्यादित षटकांचाच नव्हे, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. तो सध्या कसोटी संघाचा भाग नसला, तरी कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्याची त्याची क्षमता अफाट आहे. मी स्वतः उत्तर प्रदेशचा असल्याने मला ठाऊक आहे की त्याने यूपीच्या संघासाठी काय कामगिरी केली आहे. अनेक फलंदाज धावा करतात, परंतु रिंकूच्या धावांनी संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशच्या संघाचे नेतृत्व केले असून तो आता आयपीएलमध्येही ही धुरा सांभाळण्यास सक्षम आहे.’’
कैफच्या मते, रिंकू सिंह गेल्या ८ वर्षांपासून केकेआरशी जोडलेला असून तो या संघाचा अविभाज्य घटक आहे. ‘‘रिंकू मानसिकदृष्ट्या इतका प्रबळ आहे की, तो फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ उत्तम राखू शकतो. त्याला लीडरशिप ग्रुपमध्ये सामील करणे ही केकेआरसाठी दीर्घकालीन गुंतवणूक ठरेल. संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेनंतर रिंकूचा विचार करावा किंवा या हंगामाच्या मध्यावरच त्याला नेतृत्व सोपवावे,’’ असे स्पष्ट आवाहन कैफने केले आहे.
केकेआरने अनुभवाचा विचार करून वेंकटेश अय्यरऐवजी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवले असले, तरी रहाणेच्या फिरकी गोलंदाजीपुढील कमकुवतपणावर कैफने बोट ठेवले आहे. रहाणेने विराट कोहलीचा आदर्श समोर ठेवावा, असा सल्ला देताना कैफ म्हणाला, ‘‘विराट कोहलीवरही एक काळ असा आला होता जेव्हा त्याला फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावा काढता येत नव्हत्या. मात्र, विराटने आपल्या खेळात बदल केले आणि टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. रहाणेसाठी हे एक उत्तम उदाहरण असून त्याने फिरकीचा सामना कसा करावा, हे कोहलीकडून शिकले पाहिजे.’’