

मुंबई : 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तानच्या इशाऱ्याचा भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने कडक शब्दांत समाचार घेतला. पाकिस्तान क्रिकेट मंडळात इतके धाडस नाही. त्यामुळे, ते स्पर्धेवर बहिष्कार टाकतील असे मला अजिबात वाटत नाही, असे रहाणे याप्रसंगी म्हणाला.
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेबाबतचा वाद बांगला देश क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेमुळे सुरू झाला.
बांगला देशने सुरक्षेचे कारण देत त्यांचे कोलकाता आणि मुंबई येथे होणारे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. नंतर बांगला देशला स्पर्धेतून वगळत त्यांच्याऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. मात्र, यादरम्यान पाकिस्तानने बांगला देशला पाठिंबा देत आपणही स्पर्धेवर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर रहाणे बोलत होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याची पाकिस्तानची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे. यापूर्वी बांगलादेशने भारतात खेळण्याबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची 'पीसीसीबी'ने पाठराखण केली होती. मात्र, जेव्हा स्वतःच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तेव्हा बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालण्याऐवजी पाकिस्तानने प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा व्यवहार्य निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी (दि. २९) होणाऱ्या घोषणेकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेत मोहसीन नक्वी यांनी 'समृद्ध भविष्य' आणि 'जागतिक संबंध' हे दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. आयसीसीशी शत्रुत्व पत्करणे पाकिस्तानला परवडणारे नसल्याने, केवळ हट्टापोटी स्पर्धेवर बहिष्कार न टाकता सहभागाची अधिकृत घोषणा करून वादावर पडदा टाकण्याचे संकेत पीसीबीने दिले आहेत.