

India vs New Zealand Brett Randell Cricket Record
नवी दिल्ली: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या रणांगणात 'विजयाचा गुलाल' उधळण्यासाठी आज भारत-न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. एका बाजूला रंगांचा सण आणि दुसरीकडे टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाची स्वप्नवत फायनल; अशा दुहेरी उत्साहाने आजचा दिवस खास ठरणार असतानाच न्यूझीलंडच्या क्रिकेट जगतात एक मोठा विक्रम घडला आहे. न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाने असा पराक्रम केला आहे जो गेल्या २५४ वर्षांत कोणालाही जमला नव्हता.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग ५ चेंडूंत ५ गडी बाद करून एक नवा जागतिक इतिहास रचला आहे. 'प्लंकेट शील्ड' स्पर्धेत 'सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स' विरुद्ध 'नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स' यांच्यात मॅकलीन पार्क येथे हा सामना खेळला गेला. नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सच्या डावाच्या सुरुवातीलाच रँडेलने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. रँडेलने आपल्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेन्री कूपरला बाद केले. त्यानंतर पुढच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर त्याने सलग चार बळी घेतले. यात न्यूझीलंडचा माजी कसोटी सलामीवीर जीत रावल याचाही समावेश होता. पाचव्या चेंडूवर ख्रिस्तियन क्लार्कला बाद करताच रँडेलने हा 'महाविक्रम' आपल्या नावावर केला.
'असोसिएशन ऑफ क्रिकेट स्टॅटिस्टिशियन्स अँड हिस्टोरियन्स'च्या नोंदीनुसार, १७७२ मध्ये पहिला अधिकृत प्रथम श्रेणी सामना खेळला गेला होता. तेव्हापासून आजवर एकाही गोलंदाजाला सलग ५ चेंडूंत ५ गडी बाद करता आले नव्हते. आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने टी-२० मध्ये असा पराक्रम केला असला, तरी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात ही पहिलीच वेळ आहे.
भारतात सट्टेबाजी बेकायदेशीर असल्याने वर्ल्डकप फायनलवर कितीचा सट्टा लागला आहे, याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध असण्याचे कारणच नाही. मात्र, यापूर्वीचे आकडे पाहिल्यास यंदाही कित्येक हजार कोटींच्या घरात हा आकडा पोहोचत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. विविध मीडिया रिपोर्टस् आणि तपास यंत्रणांच्या माहितीनुसार भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर सट्टा लागल्याचे वृत्त आहे. गुरुग्राम आणि रूरकेलासारख्या शहरांमध्ये सट्टेबाजीच्या रॅकेटवर छापे टाकून पोलिसांनी कोट्यवधींचे व्यवहार उघडकीस आणले आहेत. आंतरराष्ट्रीय बेटिंग प्लॅटफॉर्मवर भारताला जिंकण्यासाठी पसंती दिली जात आहे.