

Sunil Gavaskar on T20 World Cup 2026 Final
अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलची तयारी पूर्ण झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रंगणार्या महामुकाबल्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव याला मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी एका स्टार फलंदाजाला वगळण्याची विनंती केली असून, तो आजवरच्या चुकांमधून काहीही शिकलेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
'इंडिया टूडे'शी बोलताना, "२०२६ च्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ नक्की कोणाला खेळवायचे, या विचारात आहे. विशेषतः सलामीवीर अभिषेक शर्माच्या खराब फॉर्ममुळे संघ चिंतेत आहे, कारण त्याने संपूर्ण स्पर्धेत केवळ ८० धावा केल्या आहेत (ज्यापैकी ५५ धावा त्याने एकाच सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध केल्या होत्या). अभिषेकची ही कामगिरी पाहता, दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि व्यवस्थापनाला असा सल्ला दिला आहे की, "रविवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या या मोठ्या सामन्यासाठी अभिषेक शर्माला संघात स्थान देऊ नये."
टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी अभिषेक शर्मा अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये होता, परंतु अमेरिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तो आजारी पडल्याने त्याचे वजन आणि स्नायू दोन्ही कमी झाले, ज्याचा फटका त्याच्या खेळाला बसला आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना स्पष्ट केले की, अभिषेक सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असला तरी, तो आपल्या चुकांमधून काहीच शिकलेला नाही. तो वारंवार एकाच पद्धतीने बाद होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे कठीण असले तरी, अहमदाबादमधील महत्त्वाच्या सामन्यासाठी त्याला संघातून वगळणे आवश्यक असल्याचेही गावस्कर यांनी स्पष्ट केले.
सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर चिंता व्यक्त करताना सांगितले की, विरोधी गोलंदाज त्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेत आहेत आणि अभिषेक त्यामध्ये सुधारणा करताना दिसत नाही. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात इशान किशनने संजू सॅमसनसोबत सलामीला यावे, असा सल्लाही गावस्कर यांनी दिला आहे. अभिषेकच्या जागी 'फिनिशर' म्हणून रिंकू सिंगला संघात स्थान मिळावे, असे गावस्कर यांचे मत आहे. रिंकूच्या सकारात्मक वृत्तीचा उल्लेख करत गावस्कर म्हणाले की, त्याच्या हातावर असलेल्या 'गॉड्स प्लॅन' टॅटूप्रमाणेच अशा खेळाडूंसाठी कठीण प्रसंगी गोष्टी आपोआप जुळून येतात.
सुनील गावस्कर यांनी भारतीय संघात दुसरा महत्त्वाचा बदल सुचवताना वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, 'सुपर ८' फेरीपासून मोठ्या संघांविरुद्ध खेळताना वरुणचा आत्मविश्वास कमी झाला असून त्याने बरेच धावा दिल्या आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचे मैदान मोठे असल्याने तिथे कुलदीप यादव अधिक प्रभावी ठरू शकतो, कारण तो सपाट खेळपट्टीवरही चेंडू चांगल्या प्रकारे फिरवू शकतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.