Mohammad Amir India Win: वर्ल्डकप घेऊन माझ्या घरी थोडेच येणार आहेत... भारत हरणार म्हणणाऱ्या पाक क्रिकेटपटूचे 'गिरे तो भी टांग उपर'
Mohammad Amir statement T20 World Cup 2026: भारताने टी २० वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी २० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. याचबरोबर भारत हा तीन टी २० वर्ल्डकप जिंकणारा आणि मायदेशात टी २० वर्ल्डकप जिंकणारा पहिला देश ठरला आहे. या विजयानंतर देशभरात आनंदाचं अन् सेलिब्रेशनचं वातावरण आहे.
मात्र शेजारी देशातील पाकिस्तानातील एका क्रिकेटपटूला भारताच्या विजयानं चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. त्यानं समालोचन करताना भारताचा पराभव होईल असं भाकीत वर्तवलं होतं. मात्र त्याच्यासह त्याचं भाकीत देखील उलटं पडलं. हा तोंडावर आपटलेला पाकिस्तानी माजी खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे मोहम्मद आमिर... भारतानं टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मोहम्मद आमिरला त्याच्या भारताच्या पराभवाच्या भाकिताबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी जळफळाट झालेल्या मोहम्मद आमिरने उलट सुलट उत्तर दिलं.
आमिरचे गिरे तो भी टांग उपर...
आमिरला भारत जिंकला तुमचे भाकीत चुकीचं ठरलं काय सांगाल..? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी मोहम्मद आमिरने जिंकला आहेत. बस ठीक आहे. कप आपल्या घरी घेऊन जाणार, माझ्या घरी थोडीच घेऊन येणार आहेत. वेल डन... अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेवरून मोहम्मद आमिरने भारताचा विजय खुल्या दिलानं स्विकारल्या नसल्याचं दिसून येतं.
भारताच्या विजयानंतर पाकिस्तानच्या काही खेळाडूंना राग आला आहे. यात मोहम्मद आमिरचे नाव आघाडीवर आहे. मोहम्मद आमिरने टीव्ही शो मध्ये प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'भारतीय संघ वेस्ट इंडीज आणि इंग्लंडविरूद्धच्या सामन्याच्या तुलनेत फायनलमध्ये जास्त आक्रमक आणि डॉमिनेट करून खेळली. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात ते नुसते तुटून पडले होते.
दुसरा पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजादने मोहम्मद आमिर याला छेडण्यासाठी त्याच्या भाकीतावर ट्रोल केलं. त्यावर आमिरने आपला बचाव करत मी क्रिकेटिंग स्कील्सच्या दृष्टीकोणातून भारताच्या पराभवाची भाषा केली होती असं सांगितलं.
आमिरच्या अनेक खोट्या भविष्यवाण्या
मोहम्मद आमिर हा खोट्या भविष्यवाण्या करण्यात माहीर आहे. त्याने फायनलपूर्वी देखील भारताच्या पराभवाच्या भविष्यवाणी केली होती. मोहम्मद आमिरने आपलं पहिलं भाकीत वर्तवल्यानंतर तो ट्रोल झाला होता. नवज्योतिसिंग सिद्धूने त्याला ढोंगी बाबा म्हटलं होतं.
त्यानंतर आमिरने टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचणार नाही अशी देखील भविष्यवाणी केली होती. त्यानंतर आमिरने भारत इंग्लंड विरूद्धचा सेमी फायनल सामना गमावणार असं देखील म्हटलं होतं. मात्र त्यावेळी देखील तो तोंडावर पडला होता.
यावेळी त्याने मोक्याच्या क्षणी झेल सुलटे म्हणून भारत जिंकला असं म्हणत सारवासारव केली होती. त्याच्या मते हॅरी ब्रूकने संजू सॅमसनचा कॅच पकडला असता तर इंग्लंड सामना जिंकला असता.
फायनलबाबत काय म्हणाला होता?
पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजच्या हसना मना हैं या शोचा होस्ट ताबिश हाश्मीने मोहम्मद आमिर, अहमद शहजाद, राशिद लतीफ यांना भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात कोण विजय मिळवणार असं विचारलं होतं. त्यावेळी जरी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली किंवा गोलंदाजी केली तरी न्यूझीलंडच जिंकणार असं सांगितलं होतं. मात्र राशिद लतीफ आणि अहमद शहजाद यांनी भारत जिंकणार असं सांगितलं होतं.

