

cheteshwar pujara s cricket records and achievements
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याने आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याने भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर, कसोटी क्रिकेटमधील एका महान फलंदाजाच्या कारकिर्दीवर पडदा पडला आहे.
पुजारा हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानी आहे. त्याची कारकीर्द ही केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, ती संयम, समर्पण आणि तंत्रशुद्ध फलंदाजीचे प्रतीक आहे. त्याचे योगदान भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच स्मरणात राहील. या निमित्ताने, त्याच्या नावावर असलेल्या काही विशेष विक्रमांवर आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीवर एक नजर टाकूया.
पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द प्रामुख्याने कसोटी क्रिकेटभोवती केंद्रित राहिली. त्याच्या कामगिरीचे आकडे खालीलप्रमाणे :
कसोटी क्रिकेट : १०३ सामन्यांच्या १७६ डावांमध्ये त्याने ४३.६० च्या प्रभावी सरासरीने ७,१९५ धावा केल्या. यामध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०६* आहे.
एकदिवसीय क्रिकेट : त्याने ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्यात १०.२० च्या सरासरीने एकूण ५१ धावा केल्या.
टी-२० आंतरराष्ट्रीय : त्याला भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फार कमी फलंदाजांना एकाच सामन्याच्या पाचही दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. पुजारा या विशेष फलंदाजांच्या यादीत समाविष्ट आहे. त्याने २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर हा पराक्रम केला होता.
त्याच्यापूर्वी केवळ दोन भारतीय फलंदाजांनी ही कामगिरी केली होती. यात एम. एल. जयसिम्हा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९६०) आणि रवी शास्त्री (विरुद्ध इंग्लंड, १९८४) यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या तिन्ही भारतीयांनी हा विक्रम कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावरच नोंदवला आहे.
२०१८ साली चेतेश्वर पुजाराने कामगिरीची एक अशी उंची गाठली, जिथपर्यंत यापूर्वी कोणताही भारतीय क्रिकेटपटू पोहोचू शकला नव्हता. त्याने एकहाती ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीवर पराभवाची धूळ चारली. तीन शतकांच्या साहाय्याने ५२१ धावा फटकावत आणि तब्बल १,२५८ चेंडूंचा सामना करत, भारताला ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देताना तो 'मालिकावीर' ठरला. त्यावेळी ७१ वर्षांत आणि ११ दौऱ्यांमध्ये कोणत्याही भारतीय संघाला अशी कामगिरी साध्य करता आली नव्हती.
आपल्या संयमी आणि चिवट फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुजाराने एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा भारतीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांची कसोटीत त्याने २०२ धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. या खेळीसाठी त्यांनी ५२५ चेंडूंचा सामना केला आणि तब्बल ६७२ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकला होता. या कामगिरीसह, ते कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता, ज्याने पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी येथे ४९५ चेंडूंत २७० धावांची खेळी केली होती.
संथ फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने आपल्यावरील टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत टी-२० क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०१९ मध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळताना त्याने रेल्वेविरुद्ध केवळ ६१ चेंडूंत शतक झळकावले होते. या कामगिरीमुळे ते सौराष्ट्र संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. या शतकी खेळीत त्याने पहिल्या ५० धावा २९ चेंडूंत, तर पुढील ५० धावा ३२ चेंडूंत पूर्ण केल्या होत्या.
पुजाराची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे. त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत २१,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ज्यात १८ द्विशतकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफीमध्येच त्याने ९ द्विशतके झळकावली आहेत. या कामगिरीमुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक द्विशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. या यादीत सर डॉन ब्रॅडमन (३७), वॉली हॅमंड (३६) आणि पॅट्सी हेंड्रेन (२२) हे दिग्गज खेळाडू त्याच्या पुढे आहेत.