

Sunil Gavaskar on Ishan Kishan : भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज इशान किशनने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याने शुभमन गिलच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी २२४ धावांची भक्कम भागीदारी रचली.याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानसमोर ४०३ धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ अवघ्या २३२ धावांवर आटोपला. इशान किशनची ही वादळी खेळीवर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर खुश झाले आहेत. त्यांनी इशानबाबत मोठे विधान केले आहे.
सुनील गावस्कर म्हणाले की, इशानने आगामी २०२७ वनडे वर्ल्ड कपमधील आपली जागा जवळपास पक्की केली आहे. किशनने अवघ्या ७९ चेंडूंमध्ये १२५ धावांची झंझावाती खेळी केली. गेल्या वेळी द्विशतक झळकावल्यानंतर, सुमारे चार वर्षांत पहिल्यांदाच तो वनडेत शतक झळकावण्यात यशस्वी ठरला आहे.
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे की, "मला वाटते की त्याला (वर्ल्ड कपचे) व्हिसा तिकीट मिळाले आहे. आता इशान किशनला संघातून बाहेर काढण्यासाठी इतर कोणत्याही खेळाडूला अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने सरस कामगिरी करावी लागेल. तो टी२० फॉरमॅटमध्येही मोठे योगदान देतो आणि सध्या त्याची फलंदाजी उत्कृष्ट सुरू आहे." संघात पुनरागमन केल्यापासून इशान किशन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत आपले एक हजार धावा देखील पूर्ण केल्या. या खेळीदरम्यान किशनने १४ चौकार आणि ७ षटकार ठोकले.
गावस्कर पुढे म्हणाले, " इशानचा डिफेन्सही आता खूप मजबूत झाला आहे. एखादा शॉर्ट बॉल मिळताच तो लगेच बॅक फूटवर जाऊन त्यावर षटकार ठोकतो. आता तो एक परिपूर्ण आणि प्रगल्भ खेळाडू बनला आहे. गेल्या दीड वर्षात त्याच्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. आधी ऑफ स्टंपच्या आसपास खेळताना तो थोडा चाचपडताना दिसायचा आणि त्याच्याकडे लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह नव्हता, पण आता तो हा शॉटही सहज खेळतो. याच कारणामुळे त्याला शांत ठेवणे अत्यंत कठीण आहे."
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाच्या यजमानपदाखाली होणारा २०२७ चा वनडे वर्ल्ड कप ४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. या वर्ल्ड कपपूर्वी भारताला जवळपास दोन डझन (२४) सामने खेळायचे आहेत आणि संघ व्यवस्थापनाने आधीच स्पष्ट केले आहे की, ते वेगवेगळ्या समीकरणांचा वापर करून पाहतील. या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धची ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातच किशनच्या या दमदार कामगिरीने आता निवडकर्त्यांचे टेन्शन मात्र नक्कीच वाढवले आहे.