

Mumbai Indians Playoff Chances: IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची (MI) कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली असली, तरी प्लेऑफची आशा पूर्णपणे संपलेली नाही. 10 सामन्यांपैकी केवळ 3 विजय मिळवत मुंबई सध्या गुणतालिकेत 6 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
सध्या गुणतालिकेत पंजाब किंग्स 13 गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू 12 गुण आणि चांगल्या नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद, राजस्थान आणि गुजरात टायटन्स यांच्याही खात्यात 12-12 गुण असून ते टॉप-5 मध्ये आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स 8-8 गुणांसह मधल्या फळीत आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्स 7 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्ससमोर मोठं आव्हान उभं आहे. IPL मध्ये साधारणपणे 16 गुण हे प्लेऑफसाठी सुरक्षित मानले जातात. काहीवेळा 14 गुणांवरही संघ पात्र ठरतो, पण त्यासाठी इतर संघांच्या निकालांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं.
मुंबई इंडियन्सचे अजून चार सामने बाकी आहेत. जर त्यांनी हे चारही सामने जिंकले, तरी त्यांचे एकूण गुण 14 पर्यंतच पोहोचतील. त्यामुळे केवळ विजय पुरेसे नाहीत, तर इतर संघांचा सतत पराभव होणे, नेट रन रेटमध्ये मोठा फरक ठेवणे अशा अनेक गोष्टी मुंबईच्या बाजूने घडाव्या लागतील. त्यामुळे त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता अत्यंत कमी आहेत.
मुंबईचे उर्वरित सामने असे आहेत—10 मे रोजी RCB विरुद्ध रायपूरमध्ये, 14 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध धर्मशाळेत, 20 मे रोजी कोलकातामध्ये KKR विरुद्ध आणि 24 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध.
यंदाच्या हंगामात घरच्या वानखेडे मैदानावरही मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. 6 पैकी फक्त 2 सामने त्यांनी जिंकले आहेत. एकूणच, मुंबई इंडियन्ससमोर आता ‘करा किंवा मरा’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. उर्वरित सर्व सामने जिंकणे आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहणे हाच एकमेव मार्ग त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवू शकतो.