

IPL 2026 BCCI pitch policy
नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएल हंगामात २२० पेक्षा जास्त धावसंख्या होणे ही आता नवीन बाब राहिलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे खेळपट्ट्यांचे बदललेले स्वरूप. एकीकडे चाहते आणि क्रिकेट विश्लेषक भल्यामोठ्या धावसंख्यांच्या विक्रमांबाबत खल करत असताना, दुसरीकडे काही फ्रँचायझींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या मते, आता 'होम ॲडव्हेटेज' घरच्या मैदानावर मिळणारा फायदा) ही संकल्पना जवळपास संपुष्टात आली आहे.
आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कडक धोरण राबवले आहे. खेळपट्ट्या तयार करण्याच्या प्रक्रियेत फ्रँचायझींनी कोणताही हस्तक्षेप करू नये, यासाठी बोर्डाने कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी रात्री, दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकांनी फिरोजशाह कोटला येथील खेळपट्टीबद्दल अनिश्चितता व्यक्त केली, त्यांनी या हंगामात पाचपैकी चार सामने गमावले आहेत. "आम्हाला ज्या प्रकारच्या खेळपट्टीवर खेळायचे आहे, त्यावर आमचे नियंत्रण असावे असे कितीही वाटले तरी बीसीसीआयचे स्पष्ट आदेश आहेत.
बीसीसीआय स्वतः खेळपट्ट्यांची देखरेख करते आणि कोणत्याही स्थानिक संघाला खेळपट्टीचा अतिरिक्त फायदा मिळणार नाही याची काळजी घेत आहे. त्यामुळे समोर येणाऱ्या खेळपट्टीवरच खेळावे लागते. दिल्ली आमचे घरचे मैदान असूनही, तिथली खेळपट्टी नेमकी कशी असेल हे समजून घेणे आमच्यासाठी कठीण गेले आहे, असे बादानी यांनी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर सांगितले. ते पुढे म्हणाले, "येथे अशाही खेळपट्ट्या होत्या जिथे ७५ धावा झाल्या आणि एका सामन्यात २६५ धावांचा पाठलागही झाला. पुन्हा एकदा ही फिरकीला साथ देणारी खेळपट्टी होती. खेळपट्ट्यांमध्ये थोडा सातत्य असायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयने दिलेल्या शिफारशींमध्ये गोलंदाजांना किमान मदत मिळेल अशा खेळपट्ट्या बनवण्यास सांगण्यात आले आहे. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमधील आपले धोरण आयपीएलमध्येही लागू केले आहे, ज्यानुसार बोर्डाचा एक क्युरेटर स्थानिक क्युरेटरसोबत मैदानावर उपस्थित राहून कोणताही बाह्य हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतो. आयपीएल प्लेऑफ आणि फायनलदरम्यान, बोर्डाचे मध्यवर्ती क्युरेटर्स मैदानांचा पूर्ण ताबा घेतील.
मैदानाची बाउंड्री (सीमा) ७७ मीटरपेक्षा जास्त नसावी.
खेळपट्ट्यांवर चेंडू फारसा वळू नये किंवा जास्त फिरकी नसावी.
खेळपट्टीवर गवताचे समान आवरण असावे, जेणेकरून खेळपट्टी कोरडी पडणार नाही.
एका फ्रँचायझी सदस्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले की, "काही संघांकडे तगडी फिरकी गोलंदाजी आहे, त्यांना धीम्या खेळपट्ट्या हव्या असतात. तर काहींकडे वेगवान गोलंदाज असल्याने त्यांना नवीन चेंडूला मदत मिळणाऱ्या खेळपट्ट्या हव्या असतात. पण आता सर्वच ठिकाणच्या खेळपट्ट्या सारख्या झाल्या आहेत. संघ कोठे खेळतोय याने फरक पडत नाही, कारण खेळाडूंना सर्वत्र सारख्याच परिस्थितीची अपेक्षा असते." जेव्हा गोलंदाजांना थोडी मदत मिळते, तेव्हा फलंदाजी पत्त्यासारखी कोसळते. कारण फलंदाज खेळपट्टी सपाट असेल अशा मानसिकतेने मैदानात उतरतात आणि जेव्हा चेंडू फिरतो किंवा वळतो, तेव्हा त्यांच्यासाठी जुळवून घेणे कठीण होते, असेही एका फ्रँचायझी सदस्याने स्पष्ट केले.
आता स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून उन्हाळाही वाढत आहे, त्यामुळे खेळपट्ट्या थकण्याची आणि धावसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी आणि बीसीसीआय सुवर्णमध्य शोधून 'होम ॲडव्हेटेज' पुन्हा मिळवून देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.