

Asian Games 2026 India vs Bangladesh : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा ११४ धावांनी धुव्वा उडवत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयामुळे भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. आता २२ सप्टेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी होईल. त्याच दिवशी कांस्यपदकासाठी बांगलादेश आणि पाकिस्तान संघ आमने-सामने असतील.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शफालीच्या शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ४ बाद १९५ धावांची मजल मारली. शफालीने ४९ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंमध्ये ४० धावांची खेळी केली, तर स्मृती मानधनाने १९ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या.
बांगलादेशचा संघ १५.४ षटकांत ८१ धावांत सर्वबाद झाला. दिलारा अख्तरने सर्वाधिक २७ धावा केल्या, तर शर्मिन अख्तरने १० आणि सुलताना खातूनने १२ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त बांगलादेशची एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकली नाही. भारताकडून नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले; श्रीचरणीने दोन बळी घेतले, तर क्रांती गौड आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आज झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे भारत आणि श्रीलंका हे संघ नुकत्याच झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही आमनेसामने आले होते, जिथे भारतीय संघाने सहज विजय मिळवला होता.
भारताने यापूर्वी २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि आता पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.