

Shoaib Akhtar on India vs New Zealand Final
नवी दिल्ली : २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताने एकतर्फी विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, भारताचा हा दणदणीत विजय पाकिस्तानच्या पचनी पडलेला दिसत नाही. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने नेहमीप्रमाणेच थयथयाट केला आहे. भारताच्या या वाढत्या प्रभावामुळे त्याने अत्यंत वादग्रस्त असे विधान केले आहे. पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाच्या टिप्पण्यांमुळे इंटरनेटवर भारतीय क्रिकेट चाहत्यांकडूनही सडेतोड प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून तिसरा टी-२० विश्वचषक जिंकला. अनेक क्रिकेट तज्ञांनी भारताच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक केले. पण टॅपमॅड शो ‘गेम ऑन है’ मध्ये पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाजला शोएब अख्तरला चांगल्याच मिरच्या झोंबल्या त्याने भारताची तुलना “श्रीमंत मुला”शी केली.
शोएब अख्तर म्हणाले की, जेव्हा एखाद्या परिसरात एक श्रीमंत मुलगा सर्व गरीब मुलांना बोलावतो. तो म्हणतो, 'चला, आपण क्रिकेट खेळूया.' भारत आपल्यासोबत हेच करत आहे. आठ संघांपैकी ते चार संघ ठेवतात. त्या चारपैकी ते पुन्हा तीन संघांना बोलावतात आणि पुढे जातात; मग ते म्हणतात, 'बघा, मी जिंकलो.' अशा प्रकारे खेळ करत भारताने क्रिकेटचा नाश केला आहे.
अंतिम सामन्याआधी शोएब अख्तरने मान्य केले की, विश्वविजेता होण्यासाठी भारतच प्रबळ दावेदार आहे, पण त्याचवेळी त्याने न्यूझीलंड जिंकावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. अख्तर म्हणाला की, "न्यूझीलंडसमोर भारताचे आव्हान कठीण असेल, पण भारतीय संघावर दीड अब्ज लोकांच्या अपेक्षांचे मोठे दडपण आहे. यापूर्वी त्यांनी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशीच एक अंतिम फेरी गमावली आहे. क्रिकेटचा विचार करता आता न्यूझीलंडने विश्वचषक जिंकण्याची वेळ आली आहे."
कठीण प्रसंगामध्ये खेळाडूंना पाठिंबा दिल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे कौतुक केले. प्रशिक्षकांनी खेळाडूंवर दाखवलेल्या विश्वासामुळे कधीकधी मोठ्या स्पर्धांमध्ये फरक पडू शकतो, असे त्याने म्हटले.
भारताच्या विजयानंतर टीका करणारा शोएब अख्तरबरोबरच एका टॉक शोमध्ये माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमिरनेही एक विचित्र विधान केले. आमिर म्हणाला की, न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर पुरेसा दबाव टाकू शकले नाहीत, त्यामुळे भारताला हा सामना सहजपणे आपल्या ताब्यात घेता आला. पाकिस्तानमधून येणाऱ्या अशा विधानांमुळे वादात भर पडली आहे. पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाच्या टिप्पण्यांमुळे इंटरनेटवर भारतीय क्रिकेट चाहत्यांकडूनही सडेतोड प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या ८९ (४६ चेंडू), अभिषेक शर्माच्या ५२ (२१ चेंडू) आणि इशान किशनच्या ५४ (२५ चेंडू) धावांच्या जोरावर भारताने २५५ धावांचा डोंगर उभा केला. शिवम दुबेने केवळ ८ चेंडूत नाबाद २६ धावांची स्मरणीय खेळी केली. न्यूझीलंडचा टिम सेफर्ट (५२ धावा) वगळता इतर फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने अवघ्या १५ धावांत ४ बळी घेत आणि अक्षर पटेलने ३ बळी घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. भारताने हा सामना ९६ धावांनी जिंकून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकणारा पहिला संघ आणि मायदेशात ट्रॉफी उंचावणारा पहिला यजमान देश बनून नवा इतिहास रचला आहे.