

टीम इंडियाची युवा सलामीवीर शेफाली वर्माने आपल्या वडिलांना दिलेला शब्द पाळत आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. विश्वचषक संघात निवड न झालेल्या शेफालीला, प्रतीका रावलच्या दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी अचानक संघात स्थान मिळाले होते.
उपांत्य फेरीत अपयशी ठरल्यानंतर तिने वडिलांशी एक खास वायदा केला होता आणि रविवारी खेळण्यात आलेल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात २१ वर्षीय या आक्रमक फलंदाजाने स्मरणीय अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केले. यासोबतच, विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारी ती सर्वात कमी वयाची फलंदाज ठरली आहे. दुर्दैवाने, ती आपले शतक पूर्ण करण्यापासून वंचित राहिली आणि ८७ धावांवर बाद झाली.
२१ वर्षीय शेफालीने पूनम राऊत आणि वीरेंद्र सेहवाग यांचे विक्रम मोडले. ती भारतासाठी विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळणारी महिला खेळाडू आहे. तिच्या आधी हा विक्रम पूनमच्या नावावर होता. माजी फलंदाज पूनमने २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ११५ चेंडूत ८६ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. तिने अंतिम सामन्यात २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला इंग्लंडकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
भारतासाठी विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर आहे. २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात माजी सलामीवीर गंभीरने १२ चेंडूत ९ चौकारांसह ९७ धावा केल्या. २७५ धावांचे लक्ष्य गाठताना भारताने सहा विकेटने विजय मिळवला. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात ७९ चेंडूत नाबाद ९१ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि दोन षटकार मारले.
माजी स्फोटक सलामीवीर सेहवाग यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ८१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १० चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तो अंतिम सामना भारताने १२५ धावांनी गमावला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ बाद ३५९ धावा केल्या होत्या.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर टॉस हरल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. पावसामुळे दोन तासांच्या विलंबाने सुरू झालेल्या या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करणे कठीण होते, पण शेफालीने क्रीजवर उतरताच या सर्व शक्यतांना खोटे ठरवले. उपांत्य फेरीत फक्त १० धावांवर बाद झालेल्या शेफालीने यावेळी धमाकेदार फलंदाजी करत केवळ ४९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
शेफालीसाठी हे अर्धशतक खूप खास होते, कारण इथपर्यंत पोहोचायला तिला जवळपास ३ वर्षांचा कालावधी लागला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळ करण्यासाठी झगडणाऱ्या शेफालीने ३ वर्षांहून अधिक काळानंतर या फॉर्मेटमध्ये अर्धशतक झळकावले. तिचे यापूर्वीचे अर्धशतक जुलै २०२२ मध्ये आले होते. यानंतर ती केवळ एकदाच ४० च्या पुढे (४९ धावा) पोहोचू शकली होती. मात्र, आता अखेरीस शेफालीने ही मोठी अडचण पार केली. हे तिच्या कारकिर्दीतील पाचवे एकदिवसीय अर्धशतक ठरले आहे.