नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) टी-20 सीरिजच्या पूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाचे दोन खेळाडू बाहेर पडले आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून देणार्या हार्दिक पंड्याला बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. यामुळे भारतीय संघाला द. आफ्रिकेसोबत झगडावे लागण्याची शक्यता आहे.
हार्दिक पंड्याच्या जागी स्पिन ऑलराऊंडर शाहबाज अहमद याची एंट्री झाली आहे; तर दीपक हुड्डाच्या जागी श्रेयस अय्यरची आणि शमीच्या जागी उमेश यादवला संधी मिळाली आहे. उमेश यादव थिरुवअनंतपूरमला पोहोचला आहे. शमीच्या जागी उमेश यादवला ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये संधी मिळाली होती. आफ्रिकेची टीम रविवारीच केरळमध्ये दाखल झाली आहे. (Ind vs SA)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, शमी कोव्हिड-19 मधून बरा झालेला नाही. त्याला आणखी वेळ हवा आहे आणि त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतून बाहेर असेल. शमीच्या जागी उमेश यादव संघात राहील.