

कोलंबो : क्रिकेटच्या मैदानात जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा तो केवळ खेळ उरत नाही, तर ती कोट्यवधी भारतीयांच्या अस्मितेची लढाई असते. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी (दि. १५) भारतीय संघाने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवून तिरंग्याची शान राखली. मात्र, विजयाचा हा जल्लोष सुरू असतानाच माजी कर्णधार रोहित शर्माच्या एका कृतीने नवा वाद ओढवून घेतला आहे. मैदानावर टीम इंडिया पाकिस्तानला 'शत्रू' मानून वागत असताना, रोहित शर्मा मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज आणि समालोचक वसीम अकरमच्या गळ्यात गळे घालताना दिसल्याने संतापाचा वणवा पेटला आहे.
रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आयसीसीने रोहितला या विश्वचषकाचा 'ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्त केले आहे. भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी रोहित आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता आणि वसीम अकरम यांच्यासोबत ट्रॉफी घेऊन मैदानात गेला होता. ट्रॉफी ठेवून परतत असताना रोहित आणि वसीम अकरम यांनी केवळ हस्तांदोलनच केले नाही, तर एकमेकांना कडकडून मिठीही मारली.
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीलाच टॉसवेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या सलमान अली आगाशी हस्तांदोलन करणे टाळून भारतीय बाणा दाखवून दिला. सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी 'नो हॅन्डशेक' धोरण कायम ठेवून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. मात्र, भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने वसीम अकरमची ज्या प्रकारे गळाभेट घेतली, ते पाहून भारतीय चाहते अवाक झाले. ‘‘सीमेवर जवान रक्त सांडत असताना, मैदानात आमच्या खेळाडूंनी पाळलेली शिस्त रोहितने का मोडली?’’ असा जळजळीत प्रश्न त्याच्या कृतीवरून उपस्थित केला जात आहे. या मुद्यावरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
सोशल मीडियावर रोहित शर्माच्या या गळाभेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी रोहितवर टीकेची झोड उठवली असून, अनेकांनी रोहितच्या कृतीला चुकीचे म्हटले असून आयसीसीचा ब्रँड अॅम्बेसेडर असणे म्हणजे पाकिस्तानच्या खेळाडूंशी जवळीक साधणे असा होतो का? असा सवाल विचारला आहे. सीमेवरील तणाव आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) भूमिकेला अनुसरून टीम इंडिया या 'नो हॅन्डशेक' धोरणावर ठाम असताना रोहितलाच ही 'झप्पी' देण्याची उबळ का आली, यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
‘‘जेव्हा संपूर्ण संघ राष्ट्रहितासाठी खेळाडूंपासून अंतर राखून आहे, तेव्हा माजी कर्णधाराने अशी जवळीक साधणे किती योग्य?’’ असा सवाल नेटकरी विचारत आहेत. मात्र, रोहित येथे एका खेळाडूच्या भूमिकेत नसून आयसीसीचा प्रतिनिधी म्हणून गेल्याचे त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
केवळ रोहितच नाही, तर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक हे दोघेही 'स्टार स्पोर्ट्स'साठी एकत्र कमेंट्री करताना दिसले. सामना संपल्यानंतरही हे दोघे मैदानात चर्चा करत होते. खेळाडूंनी मैदानावर पाळलेली शिस्त आणि माजी खेळाडूंचे मैदानाबाहेरील वर्तन यातील विसंगती सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
तणावाच्या या वातावरणात भारताने खेळाच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७५ धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव केवळ ११४ धावांत गुंडाळला गेला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या विजयामुळे भारताने दिमाखात 'सुपर-८' फेरी गाठली आहे. २० षटकांच्या या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले असले, तरी 'हस्तांदोलन' आणि 'गळाभेट' यावरून सुरू झालेला वाद लवकर शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.