

IND vs NZ 4th T20: विशाखापट्टणम येथे होणाऱ्या भारत–न्यूझीलंड चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारताने सलग तीन सामने जिंकत मालिका आधीच खिशात घातली असल्यामुळे, उर्वरित सामन्यांमध्ये कोणाला संधी द्यायची आणि कोणाला विश्रांती द्यायची, यावर टीम मॅनेजमेंटचा भर असल्याचं दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर टीममध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. याआधीच जसप्रीत बुमराला रोटेशनअंतर्गत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे चौथ्या टी-20 मध्येही त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. या घडामोडींमध्ये चर्चेत आहे तो म्हणजे हार्दिक पंड्या.
हार्दिक पंड्याने या मालिकेतील तिन्ही सामने खेळले आहेत. त्याने तिन्ही सामन्यांत गोलंदाजी केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 जवळ आल्यामुळे हार्दिकचं वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचं असणार आहे. त्याच्या फिटनेसचा इतिहास पाहता, त्याला गरज नसताना खेळवणं हा निर्णय धोकादायक ठरू शकतो.
मालिका जिंकलेली असताना हार्दिकला विश्रांती देणं महत्त्वाचं आहे. या सामन्यात काही अपघात घडल्यास त्याचा फटका थेट वर्ल्ड कपला बसू शकतो, याची जाणीव टीम मॅनेजमेंटला नक्कीच आहे.
हार्दिकला आराम दिल्यास टीम इंडियाला नव्या खेळाडूवर लक्ष देता येईल. सध्या वॉशिंग्टन सुंदर याच्या फिटनेसबाबतही प्रश्नचिन्ह आहे. अशा वेळी दुसऱ्या ऑलराउंडरला संधी देणं किंवा फलंदाजी मजबूत करण्यावर भर देणं शक्य आहे.
टीम मॅनेजमेंट श्रेयस अय्यर याला अतिरिक्त फलंदाज म्हणून संधी देऊ शकते. तसेच शिवम दुबे याच्याकडून अधिक गोलंदाजी करून घेतली जाऊ शकते. याशिवाय, एक अतिरिक्त वेगवान किंवा फिरकी गोलंदाज खेळवून बेंच स्ट्रेंथ तपासण्याचीही संधी टीमकडे आहे. मोठ्या स्पर्धेआधी अशा प्रयोगांना महत्त्व असतं. एकूणच, चौथा टी-20 सामना निकालापेक्षा प्रयोगांसाठी अधिक महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.