पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला महत्त्वाचा सल्ला दिला. यासहआयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी संघाला काय करण्याची गरज आहे हेही सांगितले. यासह त्याने संघाला न घाबरता क्रिकेट खेळण्यास सांगितले.
रोहित शर्मासाठी मी खूप आनंदी आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली भारत विश्वचषक फायनलमध्ये खेळणार हेच आयुष्याचं चक्र आहे. रोहितने दोन वेळा विश्वचषकाची फायनल खेळली आहे. स्पर्धेत भारतीय संघाची मोहीम आतापर्यंत अपराजित राहिली आहे. यावरून रोहितचे नेतृत्वगुण दिसून येतात. त्याच्या यशाबद्दल मला आश्चर्य वाटत नाही कारण मी बीसीसीआय अध्यक्ष असताना तो कर्णधार झाला होता.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित ही जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष गांगुली यांनी केला. गांगुली म्हणाला, त्यावेळी रोहितला कर्णधार व्हायचे नव्हते. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तो तयार नसल्याने त्याला समजवण्यात बराच वेळ गेला. त्याला कर्णधार बनवण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली.आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला.
गांगुली म्हणाला की, आयपीएलचे विजेतेपद जिंकणे खूप आव्हानात्मक असते. कारण, ही स्पर्धा दीर्घकाळ चालते. पुढे तो म्हणाला, रोहितच्या नावावर पाच आयपीएल जेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे, ही मोठी उपलब्धी आहे. आयपीएल जिंकणे कधी कधी अवघड असते. मला चुकीचे समजू नका, मी असे म्हणत नाही की आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगले आहे.
परंतु, आयपीएल जिंकण्यासाठी तुम्हाला अनेक सामने जिंकावे लागतात. येथे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तुम्हाला आठ-नऊ सामने जिंकावे लागतील. विश्वचषक जिंकल्याने अधिक सन्मान मिळतो आणि मला आशा आहे की रोहित तसे करेल. मला वाटत नाही की तो सात महिन्यांत दोन विश्वचषक फायनल गमावेल. अंतिम सामन्यात तो शानदार फलंदाजी करेल आणि मला आशा आहे की, तो पुढेही अशीच कामगिरी करत राहील.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या विश्वचषकात सलामीवीर म्हणून प्रभावी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला आहे. मात्र, याबाबती सौरवने विराटचे समर्थन केले आहे. तो म्हणाला की, विराटने सलामी येणे ठेवावे. त्याने सात महिन्यांपूर्वी वन-डे वर्ल्ड कपमध्ये 700 धावा केल्या होत्या. तो माणूस आहे आणि कधी कधी अयशस्वी होईल. ते स्वीकारावे लागेल. कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यासारखे लोक भारतीय क्रिकेटसाठी संस्था आहेत. तीन-चार सामन्यांमुळे तो कमकुवत खेळाडू ठरत नाही. उद्याच्या फायनलमध्ये तो चमत्कार करू शकतो.