

WTC points table : इंग्लंडने एजबॅस्टन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानविरुद्ध ३-० असा निर्भेळ विजय नोंदवला. यजमान इंग्लंडने ही एकतर्फी मालिका अनुक्रमे एक डाव आणि १०३ धावा, १९४ धावा आणि ८ गडी राखून आपल्या नावावर केली.
अंतिम कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघात मोठे बदल करण्यात आले होते, तरीही त्यांचा हा दौरा निराशाजनक रीतीने संपला. एजबॅस्टन कसोटीआधी संघात आणि प्रशिक्षक वर्गात अनेक बदल करण्यात आले, परंतु या बदलांचा सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम झाला नाही.
पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ अवघ्या १३३ धावांत गारद झाला. या मालिकेत पाकिस्तानची २०० हून अधिक धावा करण्यात अपयशी ठरण्याची ही पाचवी वेळ होती. दुसऱ्या डावात मात्र त्यांनी पुनरागमन करत ४४९ धावा उभारल्या. यामध्ये अझान अवैस, शान मसूद, बाबर आझम आणि पदार्पण करणाऱ्या रझाउल्लाह (ज्याची तळाच्या फलंदाजांमधील कामगिरी लक्षवेधी ठरली) यांच्या अर्धशतकांचा समावेश होता.इंग्लंडने पहिल्या डावात तब्बल ३२० धावांची भक्कम आघाडी घेत सामन्यावर आधीच पकड मजबूत केली होती. त्यांच्या पहिल्या पाच फलंदाजांनी अर्धशतके ठोकली.
जिंकायसाठी १३० धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडने पहिल्याच षटकात बेन डकेट आणि एमिलिओ गे यांच्या रूपात आपले दोन्ही सलामीवीर गमावले. मोहम्मद अब्बासने हे दोन्ही बळी घेतले. त्यानंतर जो रूट आणि जॉर्डन कॉक्स यांनी नाबाद अर्धशतके झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयामुळे इंग्लंडची गुण टक्केवारी सुधारून ३८.५४ % झाली आहे.दुसरीकडे, गुणतालिकेत नऊ संघांच्या यादीत पाकिस्तान सर्वात शेवटी (तळाशी) कायम असून त्यांची गुण टक्केवारी आणखी घसरून १४.८१ % वर आली आहे.
या चालू चक्रात ११ सामन्यांपैकी ५ विजय, ४ पराभव आणि २ अनिर्णित सामन्यांसह ५१.५२ % गुणांसह भारतीय संघ 'डब्ल्युटीसी' गुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताचे पुढील आव्हान न्यूझीलंडविरुद्ध असणार आहे. १९ नोव्हेंबरपासून वेलिंग्टन येथे सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.