

CSK IPL 2026
अहमदाबाद: आयपीएल २०२६ मधील ६६ व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध मिळालेल्या ८९ धावांच्या दारुण पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. हा पराभव केवळ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा शिक्का नव्हता, तर धावांच्या दृष्टीने चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ गुजरातसमोर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. या पराभवासोबतच कर्णधार गायकवाडच्या नावावर एका अशा लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे, जो कोणताही कर्णधार कधीही लक्षात ठेवू इच्छित नाही.
महेंद्रसिंह धोनीने आपल्या उत्कृष्ट नेतृत्वाने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनवले होते. मात्र, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली या महान वारशाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा संघ सलग तीन मोसमात (२०२४, २०२५ आणि २०२६) प्लेऑफचे तिकीट मिळवण्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
धोनीच्या काळात ज्या संघासाठी प्लेऑफमध्ये पोहोचणे ही एक अत्यंत साधी गोष्ट मानली जात होती आणि जो संघ स्पर्धेत सर्वात सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जायचा, तोच संघ आज सलग बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडून गुणतालिकेत तळाला संघर्ष करताना दिसत आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध मिळालेला ८९ धावांचा हा पराभव चेन्नई सुपर किंग्सच्या इतिहासावर कधीही न पुसला जाणारा डाग सोडून गेला आहे. धावांच्या फरकाचा विचार केला तर आयपीएलमधील हा चेन्नईचा आतापर्यंतचा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला आहे. यापूर्वी चेन्नईला कधीही इतक्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.
या संपूर्ण मोसमात ऋतुराज गायकवाडला ना कर्णधार म्हणून आघाडीवरून नेतृत्व करता आले, ना मैदानावरील त्याच्या निर्णयांमध्ये धोनीसारखी जादू पाहायला मिळाली. संकटसमयी सामन्याचा नूर पलटवण्यात ऋतुराज पूर्णपणे अपयशी ठरला. स्पर्धेची सुरुवात सलग तीन पराभवांनी करणाऱ्या चेन्नईला संपूर्ण मोसमात कधीही चॅम्पियन संघासारखी कामगिरी करता आली नाही. खेळाडूंची दुखापत आणि खराब फॉर्मचे कारण एका बाजूला असले, तरी एक कर्णधार म्हणून रणनीती आखण्यात आणि संघात नवा जोश भरण्यात ऋतुराज कमी पडल्याचे स्पष्ट दिसते आहे.