म्हणून विराटने १०० वी कसोटी आरसीबीच्या बंगळूरमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयला गंडवले ? | पुढारी

म्हणून विराटने १०० वी कसोटी आरसीबीच्या बंगळूरमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयला गंडवले ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना (IND vs SA) खेळत नाही. त्याच्या जागी केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. विराट पाठदुखीमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी हनुमा विहारीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. टॉसनंतर केएल राहुल म्हणाला, ‘दुर्दैवाने, विराटच्या पाठीच्या वरच्या भागात क्रॅम्प आहे. तो फिजिओच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. आशा आहे की पुढच्या कसोटीपर्यंत तो बरा होईल.’

विराटचा (Virat Kohli) हा ९९ वा कसोटी सामना होता, पण आता तो खेळत नाही, त्यामुळे आता तो केपटाऊनमध्ये ९९ वा कसोटी सामना खेळेल. विराट दक्षिण आफ्रिकेत १०० वी कसोटी न खेळल्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा झडत आहेत. काहीजण तर त्याच्या निवृत्तीबद्दल अंदाज लावत आहेत तर काही नेटकरी बीसीसीआयशी मतभेद असल्याने तो सामन्यातून बाहेर पडल्याचे म्हणत आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये तिसरी कसोटी सुरू होईल. विराट आज जर खेळला असता तर त्याची ती १०० वी कसोटी (IND vs SA) ठरली असती. जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात खेळत नसल्याने आता विराट भारतात १०० वा कसोटी सामना खेळणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर, श्रीलंकेचा संघ भारताच्या दौ-यावर येणार आहे. उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार असून पहिला कसोटी सामना २५ फेब्रुवारीला सुरू होईल. त्यामुळे विराट बंगळूरमध्ये १०० वी कसोटी खेळेल अशी चर्चा सुरू आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स संघाचे बंगळूर हे होम ग्राउंड आहे.

१०० व्या सामन्यापूर्वी विराट माध्यमांशी बोलणार आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिका (SA vs IND Test) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्गमधील वाँडरर्स स्टेडियमवर आजपासून सुरू झाला. या सामन्यातून विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीच्या कारणास्तव बाहेर पडला. दरम्यान, सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेला कोहली आला नाही. त्याच्या स्थानी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेत सहभागी झाले. यावेळी द्रविड यांना पत्रकार परिषदेतील कोहलीच्या गैरहजेरीबद्दल विचारण्यात आले. यावेळी द्रविड म्हणाले की, ‘विराट आपल्या १०० व्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येवर मीडियाशी बोलणार आहे.’

राहुल द्रविड यांनी यावेळी विराटचे कौतुकही केले. ते म्हणाले, ‘गेल्या २० दिवसांत इतके काही घडले असले तरी विराट असाधारणच राहिला. त्याने या काळात ज्याप्रमाणे सराव केला. संघासोबत राहिला हे खरोखरच कौतुकास्पद आहे.’

‘कर्णधार विराटचे हे ‘फेव्हरिट’ मैदान आहे आणि दुसर्‍या कसोटीत त्याला अनेक विक्रम (SA vs IND Test) मोडण्याची संधी आहे. शिवाय ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळही तो इथेच संपवेल,’ असा विश्‍वास द्रविड यांनी व्यक्‍त केला होता. ‘विराटसारख्या खेळाडूसोबत काम करणे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. माझ्या नजरेतून पहाल तर विराट आता चांगल्या टचमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्याप्रकारे तो सराव सत्रमात खेळतोय, ते पाहून लवकरच त्याच्याकडून मोठी खेळी होईल, असे मला वाटते. संघाचे मनोबल उंचावण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो आणि स्वतःचा आत्मविश्‍वासही उंचावतोय. भारतीय संघाने जी उंची गाठलीय, त्यात विराटचे खूप मोठे योगदान आहे, असे द्रविड म्हणाले.

विराट पत्रकार परिषदेसाठी केव्हा येईल, यावर द्रविड म्हणाले, ‘केपटाऊन येथे विराट १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. जर तेव्हा त्याने पत्रकार परिषदेत हजेरी लावली तर तो मोठा इव्हेंट होईल. तेव्हा पत्रकार त्याला १०० व्या कसोटीबाबत प्रश्‍न विचारू शकतील. त्याच्यासोबत हा क्षण सेलिब्रेटही करू शकतील; पण माझ्या माहितीत तो आजच्या पत्रकार परिषदेत नसण्यामागे काहीच कारण नाही, असा सल्लाही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिला.

Back to top button