Virat Kohli Angry: विराट कोहली अजूनही नाराज, मुंबईतील सराव शिबिराला दांडी | पुढारी

Virat Kohli Angry: विराट कोहली अजूनही नाराज, मुंबईतील सराव शिबिराला दांडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे मुंबईत सराव शिबिर सुरू झाले आहे. विराट कोहली (Virat Kohli Angry) वगळता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेले सर्व खेळाडू जोरदार सराव करत आहेत. मात्र, विराटने अद्याप सराव शिबिरात का सहभागी झालो नाही हे जाहीर केलेले नाही. गेल्या आठवड्यात बीसीसीआयने विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्व सोपवले होते. टी-२० कर्णधारपदाचा त्याग केल्यानंतर विराटने वनडे आणि कसोटीमध्ये कर्णधारपद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा निर्णय मान्य केला नाही आणि त्याला न विचारता वनडेच्या कर्णधारपदावरून हटवले. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे विराट खूप दुखावल्याची चर्चा आहे.

विराटला प्रशिक्षण शिबिरासाठी बोलावण्यात आले होते… (Virat Kohli Angry)

भारतीय क्रिकेट संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. तत्पूर्वी, मुंबईतील सराव शिबिर संपल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या दिवसापर्यंत क्वारंटाइन असेल. त्याचवेळी, द. आफ्रिकेत पोहोचल्यानंतरही टीम इंडिया क्वारंटाईनच असेल आणि फक्त बायो-बबलमध्येच सराव करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, विराटला प्रशिक्षण शिबिरासाठी सांगण्यात आले आहे. मात्र तो या शिबिरात सहभागी झालेला नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, विराट सोमवारी सराव शिबिरात सहभागी होईल अशी आमची अपेक्षा आहे. पण सोमवार रात्रीपर्यंत तो मुंबईत आलेलाच नसल्याचे समजते आहे.

भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही…

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli Angry) दक्षिण आफ्रिका दौरा खूप महत्त्वाचा आहे. या दौऱ्यावर त्याला दक्षिण आफ्रिकेत भारताला कसोटी मालिका जिंकून देण्याची संधी आहे. अजून पर्यंत टीम इंडिया द. आफ्रिका भूमीवर कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. गेल्या दौऱ्यातही भारताचा कसोटी मालिकेत निसटता पराभव झाला होता.

या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना आता सेंच्युरियन येथे २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी या कालावधीमध्ये जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल, तर तिसरा सामना ७ ते ११ जानेवारी या पाच दिवसांमध्ये केपटाऊन येथे होणार आहे.

कसोटी मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. वनडे मालिकेतील तिन्ही सामने हे केपटाऊन येथे खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका रद्द करण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी घेतल्याचे सूत्राक़्मडून समजते आहे.

Back to top button