

पुढारी ऑनलाईन डेस्क
भारताचा 'स्टार' गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा आज क्रिकेट विश्वात दबदबा आहे. आपल्या भेदक यॉर्करने त्यांनी भल्याभल्यांची भंबेरी उडवलीय. आज बुमराहचे नाव देशाबरोबर जगभरातील क्रिकेटप्रेमीमध्ये घेतलं जातयं. खूप कमी जणांना माहित असेल की, हा क्रिकेटपटू घडवण्यात त्याच्या आईचे अपार कष्ट आहेत. भारताचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह याचा आज वाढदिवस ( Happy Birthday Jasprit Bumrah) जाणून घेवूया त्यांच्या संघर्षमय प्रवासाविषयी….
बुमराह हे मुळचे पंजाबमधील. व्यवसायानिमित्त गुजरातमधील अहमदाबादमध्ये स्थानिक झाले. पितृछत्र असणारी व्यक्ती कठीण प्रसंगाला झूंज देवू शकते. मात्र जसप्रीत पाच वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. बुमराह कुटुबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या आई दलजीत बुमराह यांच्यावर पडली. त्यांनीही परिस्थिती कितीही खडतर झाली तरी त्याच्याशी दोन हात करायचे ठरवलं.
'नेटफ्लिक्स'ची डॉक्यूमेंट्री 'क्रिकेट फीवर मुंबई इंडियंस'मध्ये दलजीत बुमराह यांनी जसप्रीतच्या संघर्षमय काहाणी सांगितली होती. पतीचे निधन झाल्यानंतर त्या एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करु लागल्या. लहानपणापासून जसप्रीत याला क्रिकेटची प्रचंड आवड. आईनी त्याला प्रोत्साहन दिले. मध्यमवर्गीय कुटुंबातील जसप्रीत याला आईची साथ मिळाली. आर्थिक ओढाताण सहन केली मात्र जसप्रीतच्या सरावात कुठेही खंड पडू नये यासाठी त्या नेहमीच दक्ष असत. त्यानेही आईच्या कष्टाचे सोने केले.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहची ( Happy Birthday Jasprit Bumrah) २०१३मध्ये विदर्भ संघात निवड झाली. त्याची गोलंदाजीची शैलीच एवढी भन्नाटच. त्याचा भेदक यॉर्करने फलंदाजांना जेरीस आणले. अल्पवधीच त्याचे नावाची चर्चा सुरु झाली. २०१३ मध्येच टी २० सैयद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी त्याची गुजरात संघात निवड झाली. १०१५-१६ मध्ये ऑस्ट्रेलिया
दौर्यापूर्वी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झाला. त्याच्या ठिकाणी जसप्रीतला संधी मिळाली. यानंतर त्याने केलेली कामगिरी ही स्वप्नवतच ठरली.
जसपीत बुमराह हा २०१६ मध्ये टी२० सामन्यांत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. २०१८मध्ये त्याने दक्षिण आफ्रिका दौर्यात कसोटी पदार्पण केले. याच दौर्यातील तिसर्या सामन्यात त्याने ५ विकेट घेण्याची कमाल केली. याचवर्षी इंग्लंड दौर्यावेळीही तिसर्या कसोटी सामन्यातही त्याने दोनवेळा पाच विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातही त्याने पाच बळी पटकावत आपल्या गोलंदाजीचा दबदबा विदेशी खेळपट्ट्यांवर सिद्ध केला.
आपल्या भेदक मार्यामुळे बुमराह हा आशियातील एकमेव गोलंदाज अहे ज्या एकाच वर्षी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही दौर्यातील कसोटी पाच विकेट घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. आज भारतीय संघाबरोबर आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातील त्याचे स्थान हे भक्कम आहे. बुमराहचा यॉर्करची धास्ती यापुढेही जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या मनात कायम राहणार आहे. त्यामागे मागील १५ वर्षांहून अधिक काळ त्याने केलेले खडतर परिश्रम आहेत.