‘आमचं आयुष्‍य ५०० ते ५०१ विकेटमध्‍ये …’ आर. अश्‍विनच्‍या पत्‍नीची भावनिक पोस्‍ट चर्चेत | पुढारी

'आमचं आयुष्‍य ५०० ते ५०१ विकेटमध्‍ये ...' आर. अश्‍विनच्‍या पत्‍नीची भावनिक पोस्‍ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  इंग्‍लंड विरुद्धच्‍या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात भारताने रविवारी (१८ फेब्रुवारी) मोठा विजय नोंदवला. राजकोट कसोटीत टीम इंडियाच्‍या खेळाडू उत्‍कृष्‍ट क्रिकेटचे प्रदर्शन करत होते. फिरकीपटू आर. अश्‍विन याने याच कसोटीत आपला ५०० बळींचा टप्‍पाही पूर्ण केला. मात्र यानंतर आई आजारी असल्‍यामुळे ताे घरी गेला. यानंतर चौथ्या दिवशी पुन्‍हा मैदानात उतरत त्‍याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आता मागील दाेन दिवसांमध्‍ये अश्‍विन आणि त्‍याच्‍या कुटुंबीयांवर ओढावलेल्‍या संकटाबाबत अश्‍विन याची पत्‍नी प्रीतीने इंस्टाग्रामवर केलेली भावनिक पोस्ट सध्‍या चर्चेत आहे. ( Ravichandran Ashwin Wife Prithi Emotional post on Instagram )

अश्विनने राजकोट कसोटीच्या दुस-या दिवशी जॅक क्रॉलीला बाद करत ५०० कसोटी बळी पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही तो सहभागीही झाला होता. मात्र त्यानंतर आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो चेन्नईला आपल्‍या घरी परतला. ( Ravichandran Ashwin Wife Prithi Emotional post on Instagram )

Ravichandran Ashwin : आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे ४८ तास…

प्रीतीने इंस्टाग्रामवर केलेल्‍या पोस्टमध्ये म्‍हटलं आहे की, ‘आम्ही हैदराबाद कसोटीमध्‍ये अश्‍विन ५०० विकेट पूर्ण करेल याची वाट पाहिली; पण तसे झाले नाही. यानंतर दुसर्‍या कसोटी विशाखापट्टणममध्येही आम्‍हाला अश्‍विनच्‍या ५०० विकेटच्‍या पूर्णत्‍वाची प्रतीक्षा करावी लागली. आम्‍ही भरपूर मिठाईही विकत घेतली. मात्र जेव्‍हा त्‍याने प्रत्‍यक्षात ५०० विकेटचा टप्‍पा पूर्ण केला तेव्‍हा  कोणताही विशेष उत्सव नव्हता. हा क्षण शांतपणे पार पडला, जणू काही घडलेच नाही. 500 ते 501 (अश्विनची विकेट) दरम्यान बरेच काही घडलं. आपल्या आयुष्यातील हे सर्वात मोठे 48 तास होते. ( Ravichandran Ashwin Wife Prithi Emotional post on Instagram )

अश्विन, तू किती अप्रतिम खेळाडू आहेस

‘ही पोस्ट सुमारे 500 विकेट्ससाठी आहे. त्यापूर्वी सुमारे 499 विकेट्स. किती आश्चर्यकारक कामगिरी. अश्विन, तू किती अप्रतिम खेळाडू आहेस. मला तुझा अभिमान आहे. आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो!’, असेही प्रीतीने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे. ( Ravichandran Ashwin Wife Prithi Emotional post on Instagram )

अश्‍विनने हार मानली नाही…

भारताने दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी अश्विनला वेळेत राजकोटला पोहोचण्यासाठी बीसीसीआयने चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था केली हाेती. कौटुंबिक कठीण परिस्थिती आणि सततच्या प्रवासामुळे मानसिक थकवा असतानाही अश्विनने हार मानली नाही. तो राजकोटला परतला. चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या विजयात त्‍याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सहा षटके टाकली आणि 19 धावांत एक गडी बाद केला. अश्विन आता 23 फेब्रुवारीपासून रांची येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीतही खेळणार आहे.

आर अश्विनची 500 कसोटी बळींच्या क्लबमध्ये एन्ट्री

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने इतिहास रचला. त्याने जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचा हा आकडा गाठणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

रविचंद्रन अश्विनने 98 कसोटी सामन्यांच्या 184 डावात कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळेने 105 सामन्यांमध्ये 500 कसोटी बळी पूर्ण केले होते. त्याचबरोबर कसोटीत सर्वात जलद 500 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने 87 कसोटी सामन्यात 500 विकेट घेतल्या आहेत.

चेंडूंच्या बाबतीतही अश्विनने जेम्स अँडरसनचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेण्यासाठी एकूण 25,714 चेंडू टाकले तर जेम्स अँडरसनने यासाठी 28,150 चेंडू टाकले. आता जर आपण कमीत कमी चेंडूंमध्ये 500 कसोटी विकेट्स घेण्याबद्दल बोललो तर या यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर जेम्स अँडरसन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 500 बळी घेण्याचा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे ज्याने 25,528 चेंडूत इतक्या विकेट्स घेतल्या. (R Ashwin 500 Test Wicket)

हेही वाचा :

 

Back to top button