

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडियाचे लक्ष्य पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषकाकडे आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 दूर जाण्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेबद्दल बोलताना भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व कोणी करावे, याबाबत आपलं मत व्यक्त केले आहे. (T20 WC 2024)
2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहितने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारताचा पराभव झाला होता. या पराभवानंतर रोहित शर्माने टीम इंडियासाठी एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंनी संघाची धुरा सांभाळली.
गेल्या एक वर्षापासून हार्दिक पंड्या टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करत असला तरी, रोहितने टी-20 विश्वचषकाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. असे मत गाैतम गंभीर याने व्यक्त केले आहे. रोहित आणि कोहली या दोघांची टी-२० विश्वचषकासाठी संघात निवड झाली पाहिजे, असेही गंभीर म्हणाला. "कोहली आणि रोहितची निवड संघात झाली पाहिजे. विशेष म्हणजे मला रोहित शर्माला टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून पाहायचे आहे. होय, हार्दिक पांड्याने T20 मध्ये कर्णधारपद भूषवले आहे, पण तरीही मला रोहित शर्माला टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून खेळताना पाहायचे आहे, असे गंभीरने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
गंभीर पुढे म्हणाला, " नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित आणि कोहलीने आपण उत्तम फलंदाज असल्याचे दाखवून दिले आहे. रोहित शर्माची निवड झाल्यास विराट कोहलीची आपोआप निवड होईल. रोहितने टी-20 विश्वचषक खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्याची केवळ फलंदाज न करता कर्णधार म्हणून निवड करावी. बीसीसीआयने गुरुवारपासून (23 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी भारताच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार संघाचे नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. उपकर्णधार हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये सध्या NO.1 फलंदाज असलेल्या सूर्यकुमारकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या ऋतुराज गायकवाड पहिल्या तीन टी-20 सामन्यांसाठी उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा :