

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs BAN : ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे. सलग तीन विजयानंतर रोहित सेनेचे मनोबल उंचावले आहे. त्याचवेळी बांगलादेश संघाला दोन पराभवानंतर भारताविरुद्ध आपला दमदार खेळ दाखवण्याचे आव्हान आहे.
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा 17 वा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. पुण्याच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडतो आणि भरपूर धावा केल्या जातात. तथापि, खेळपट्टी फिरकी गोलंदाजांनाही काही प्रमाणात उपयुक्त ठरते, ज्याचा फायदा भारत आणि बांगलादेशचे फिरकी गोलंदाज घेऊ शकतील.
पुण्यातील या मैदानावर आतापर्यंत एकूण 7 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 2014 मध्ये विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने तीन सामन्यांत मैदान मारले आहे. या एमसीएवर पहिल्या डावात सरासरी 307 धावा झाल्या आहेत. त्याचवेळी दुसऱ्या डावातील सरासरी स्कोअर 281 आहे. या मैदानात सर्वोच्च धावसंख्या 356 आहे, जी भारताने इंग्लंडविरुद्ध केली होती.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत कहर केला. त्याचवेळी सिराज आणि रवींद्र जडेजाही आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माच्या बॅटने धमाकेदार खेळी केली. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला. विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर हे देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.