पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी (24 सप्टेंबर) रोजी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाला विजयासाठी 52 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 8.2 षटकात पूर्ण केले.
भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक नाबाद 20 धावांची खेळी केली. अंतिम फेरीत पोहोचून भारतीय महिला संघाने पदक निश्चित केले आहे. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. (Asian Games 2023)
तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात अत्यांत खराब झाली. त्यांनी एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्यांची सलामी जोडी फुटली. त्यानंतर पॉवरप्लेमध्ये बांगलादेशने चार विकेट गमावल्या, त्यापैकी पूजा वस्त्राकरने तीन विकेट घेतल्या. अखेर त्यांचा संपूर्ण संघ 17.5 षटकांत 51 धावांत गारद झाला.
बांगलादेशकडून केवळ कर्णधार निगार सुलतानाला (12) दुहेरी आकडा गाठता आला. पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारताकडून पूजा वस्त्राकरने 4 षटकात 17 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. तर तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, देविका वैद्य आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (Asian Games 2023)
टीम इंडियाने 52 धावांचे हे माफक लक्ष्य केवळ 8.2 षटकांत पूर्ण केले. यादरम्यान भारताने स्मृती मानधना (7) आणि शेफाली वर्मा (17) यांच्या विकेट्स गमावल्या. अखेर जेमिमाह रॉड्रिग्सने केवळ 15 चेंडूत 20 धावा तडकावल्या. तिला कनिका आहुजाची साथ मिळाली. दोघींनी संघाला विजय मिळवून दिला.