पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. डब्लिन येथे शुक्रवारी (दि.१८) झालेल्या सामन्यात भारताला डकवर्थ-लुईस नियमानुसार २ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कर्णधार आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करत बुमराहने आपल्या शानदार गोलंदाजीने सामनावीराचा पुरस्कार मिळवण्याबरोबरच अनेक रेकॉर्ड केले.
बुमराहने प्रथमच टी-२० मध्ये भारताचे नेतृत्व केले. त्याने यापूर्वी २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते. त्याने टी २० मध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना संस्मरणीय बनवला. त्याने चार षटकात २४ धावा देत दोन बळी घेतले. पहिल्याच षटकात त्याला दोन विकेट मिळाल्या. बुमराहला त्याच्या किलर बॉलिंगसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. T२० मध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गजही हे करू शकले नाहीत.
बुमराह हा टी-२० मधला भारताचा नववा कर्णधार आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये बुमराहच्या आधी भारताचे नेतृत्व वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी केले आहे. यापैकी फक्त कोहली आणि पंत यांना कर्णधार म्हणून पहिला सामना जिंकता आला नाही. उर्वरित नऊ खेळाडूंनी विजयी सुरुवात केली.
आयर्लंडविरुद्ध दोन विकेट घेत, बुमराह टी-२० मध्ये भारतासाठी चौथा संयुक्त-सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनशी बरोबरी साधली. अश्विन आणि बुमराह यांच्याकडे आता ७२-७२ विकेट्स आहेत. अश्विनने भारताकडून शेवटचा सामना १० नोव्हेंबर २०२२ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता. ती टी-२० वर्ल्ड कपची सेमीफायनल होती आणि टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाला होता. अश्विनने ६५ टी-२० सामने ७२ विकेट्ससाठी खेळले होते. त्याचवेळी बुमराहने ६१ व्या सामन्यातच त्याची बरोबरी केली.
हेही वाचा :