पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsPAK Asia Cup : आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मोठी अपडेट समोर येत आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार असून या सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. उभय संघांमधील हा महामुकाबला 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याची तिकिटेही बुक झाली आहेत, मात्र याच दरम्यान एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहत्यांची निराशा होण्याची दाट शक्यता आहे.
आशिया चषक स्पर्धेतील हाय व्होलटेज अशा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ॲक्युटवेदर (Accuweather)च्या रिपोर्टनुसार, भारत-पाक सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता 40 टक्के आहे. सामन्याच्या एक दिवस आधीही पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. याची शक्यता 51 टक्के आहे.
आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि पाक हे दोन संघ एकूण 13 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने सात तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल येऊ शकला नाही. म्हणजे विजयी टक्केवारीत भारतीय संघ पाकिस्तानच्या खूप पुढे आहे. मात्र, तरीही टीम इंडिया पाकिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून आशिया कपमध्ये दमदार सुरुवात करावीच लागेल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. (INDvsPAK Asia Cup)
आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. 17 सप्टेंबर चालणारी या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका येथे संयुक्तरित्या करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सहा देशांपैकी तीन देशांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. यात पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या संघांचा समावेशा आहे. पण तीन संघांची घोषणा होणे बाकी आहे. त्यात भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. (IND vs PAK Asia Cup)
अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी