Rohit Sharma On Bumrah : रोहित शर्माने दिली गुड न्यूज! जसप्रीत बुमराहच्या कमबॅकवर म्हणाला… | पुढारी

Rohit Sharma On Bumrah : रोहित शर्माने दिली गुड न्यूज! जसप्रीत बुमराहच्या कमबॅकवर म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma On Bumrah : आयर्लंडमधील टी-20 मालिकेत जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) खेळेल याची खात्री देऊ शकत नाही, पण तो लवकरच लवकरच पुनरागमन करेल. विश्वचषकापूर्वी त्याला संघात पाहायला आवडेल, असे विधान भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) केले. विंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पुनरागमनाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. तो आता पुनरागमनाच्या अगदी जवळ आहे. तंदुरुस्त झालेल्या बुमराहने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, बीसीसीआयने (BCCI) या वेगवान गोलंदाजाबाबत एक अपडेट दिले होते, ज्यामध्ये बुमराह एनसीएमध्ये सराव सामने खेळणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बुमराहच्या पुनरागमनाबद्दल विधान केल्यानंतर चाहते खुश झाले आहेत. (Rohit Sharma On Bumrah)

‘सर्व काही बुमरहच्या रिकव्हरीवर अवलंबून’

रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, ‘बुमराहकडे मोठा अनुभव आहे. गंभीर दुखापतीनंतर तो पुनरागमन करत आहे आणि संघाची घोषणा व्हायची असल्याने तो आयर्लंडला जाईल की नाही हे मला माहीत नाही. तो खेळू शकला तर चांगलेच आहे. आम्हाला आशा आहे की त्याचे विश्वचषकापूर्वी संघात कमबॅक करेल. गंभीर दुखापतीनंतर पुनरागमन करताना मॅच फिटनेस, सामन्याचा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. योजना काय आहे ते आपण पाहू कारण सर्व काही त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून आहे. पण सध्या सर्व काही सकारात्मक दिसत आहे,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला. ‘संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत पण विश्वचषकात कोण खेळणार ते आम्ही पाहू आणि त्यांना पूर्ण सामन्याचा सराव देऊ. आम्हाला 15 ते 20 खेळाडूंचा पूल बनवावा लागेल कारण कोणालाही दुखापत होऊ शकते,’ असेही रोहितने स्पष्ट केले.

बुमराहच्या (Bumarah) पाठीवर शस्त्रक्रिया झाली

बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त आहे. मार्चमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून तो रिकव्हरीमध्ये गुंतला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून (Team India) शेवटचा टी-20 सामना खेळला होता. आयर्लंडमधील मालिकेनंतर भारताला श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणारा आशिया कप खेळायचा आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. बुमराह जर आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका आणि आशिया चषक स्पर्धा खेळू शकला नाही तर तो विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळू शकतो.

विंडिजविरुद्धची मालिका किती महत्त्वाची?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सांगितले की, ‘ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, अनेक खेळाडू इथे नवीन आहेत. त्यांना संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे नव्या रणनितीचा भाग म्हणून अशा खेळाडूंना भूमिका दिली जाईल, ज्यात त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. याआधी टी-20 वर्ल्ड कपमध्येही अशा गोष्टी केल्या गेल्या होत्या. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वीही आम्ही या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते. संघात नवीन खेळाडू आलेली आहेत आणि ती जबाबदारी कशी पार पाडतात हे पाहावं लागेल. वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे सामने होतील. कोणत्या खेळाडूंना संधी देता येईल ते पाहू,’ असे त्याने सांगितले. (Rohit Sharma On Bumrah)

 

Back to top button