

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit-Yashavi Record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी 12 जुलैपासून सुरू झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाने आश्वासक सुरुवात केली असून पहिल्या डावात नाबाद 80 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले असून त्याला सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने पदार्पणाची कॅप प्रदान केली. विंडिजचा पहिल्या डावात 150 धावांवर खुर्दा केल्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावाला दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल कर्णधार रोहितसोबत सलामीला उतरला. या जोडीने 40 वर्षांपूर्वीच्या एका खास कामगिरीची पुनरावृत्ती केल्याचे समोर आले आहे.
प्रथम वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना विंडिजचा डाव अवघ्या 150 धावांत गारद झाला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 5 बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. त्यानंतर टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल फलंदाजीसाठी मैदानात उतरले. दोघेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात. 40 वर्षांनंतर असे घडले की टीम इंडियासाठी मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या फलंदाजांनी सलामी दिली. यापूर्वी 1983 मध्ये सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी भारतासाठी सलामी दिली होती. (Rohit-Yashavi Record)
जैस्वालने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. तो सध्या 40 धावा करून क्रीजवर आहे. त्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका केला होता. याच कारणामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली. तो आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आणि त्याने 14 सामन्यांमध्ये 625 धावा चोपल्या. ज्यात शतकाचा समावेश आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी जैस्वालशिवाय ईशान किशननेही कसोटी पदार्पण केले. तो याआधी टीम इंडियासाठी एकदिवसीय आणि टी-20 खेळला आहे. केएस भरतच्या जागी त्याला टीम इंडियात संधी मिळाली. भरतने टीम इंडियासाठी 5 कसोटी सामने खेळले होते आणि त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.