पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत विराट कोहलीबरोबर वाद घातल्यानंतर अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक चर्चेत आला. त्याने बुधवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माला बाद केल्यानंतर त्याने विचित्र पद्धतीने जल्लोष केला. त्याचे हे विचित्र सेलिब्रेशन पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या सेलिब्रेशनवरुन ताे प्रचंड ट्रोल हाेत आहे. तसेच टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही नवीनचे कान टोचले आहेत. ( IPL 2023 Naveen ul haq ) जाणून घेवूया बुधवारी झालेल्या सामन्यात नेमकं काय झालं याबाबत…
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील एलिमिनेटर सामना बुधवारी ( दि.२५) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई इंडियन्सने लखनौचा ८१ धावांनी पराभव केला. आता मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. चेन्नईचा संघाने यापूर्वीच फायनलमध्ये धडक मारली आहे.
रोहित शर्मा चौथ्या षटकात नवीनच्या चेंडूवर आयुष बडोनीकरवी ११ धावांवर झेलबाद झाला. यानंतर नवीनने दोन्ही हातांनी कान बंद करून आनंद साजरा केला. असाव विचित्र सेलिब्रेशन त्याने सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनची विकेट घेतल्यानंतरही केले. नवीन-उल-हक याची सामन्यातील सेलिब्रेशन करण्याची पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला ट्विटरवर प्रचंड ट्रोल केले जात आहे. विराट कोहलीनंतर नवीनने रोहित आणि सूर्यकुमारलाही खुन्नास दिल्याची प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत.
यापूर्वी लखनौचा कर्णधार के. एल. राहुल याने शतक झळकवल्यानंतर असेच कान बंद करुन सेलिब्रेशन केले होते. मी टीकाकारांचे ऐकत नाही, असे त्याने या सेलिब्रेशनच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सांगितले होते. नवीन हक यानेही बुधवारच्या सामन्यात असेच केले. दरम्यान, कोहलीबरोबर घातलेल्या वादानंतर त्याच्यासह आणि लखनौचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांना प्रत्येक स्टेडियममध्ये चाहत्यांकडून खूप ट्रोल केले गेले. दोघे कोणत्याही स्टेडियमवर गेले तरी चाहते स्टेडियममध्ये कोहली-कोहलीचा नारा देत होते.
एलिमिनेटर सामन्यावर भाष्य करताना टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले, नवीनच्या सेलिब्रेशन स्टाईलबद्दल मला काहीच समजत नाही. त्याला गर्दीचा त्रास होत होता का? तुम्हाला विकेट मिळाल्यावर तुम्ही कान बंद न करता प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकाव्यात. कोणी शतक ठोकले तरी कान झाकून ठेवू नका, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष केएल राहुल यालाही यावेळी टोला लागावला. श्रोत्यांच्या टाळ्या ऐका, असेही ते म्हणाले.
लखनौ विरुद्धच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ गडी गमावून १८२ धावा केल्या. लखनौकडून नवीनने चार आणि यश ठाकूरने तीन बळी घेतले. त्याचवेळी मोहसीन खानला एक विकेट मिळाली.प्रत्युत्तरात लखनौचा संपूर्ण संघ १६.३ षटकांत १०१ धावांवर गुंडाळला गेला गारद झाला. मुंबईकडून आकाश मधवालने पाच बळी घेतले. त्याचवेळी ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावला यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा :