महेंद्रसिंग धोनीमुळे भारत विजेतेपद पटकावेल : सलमान बट्ट
कराची ; वृत्तसंस्था : ‘महेंद्रसिंग धोनी हा ‘उत्कृष्ट फिनिशर’ आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा भारताला चांगला उपयोग होऊन ते स्पर्धा विजयाने ‘फिनिश’ करतील,’ असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्टने व्यक्त केले आहे.
यू ट्यूब चॅनेलवर चर्चा करताना धोनीबद्दल त्याने असे मत व्यक्त केले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप आणि एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे.
यंदाच्या टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. यासाठी भारतीय संघ कसून सराव करीत आहे. आयपीएलचा अनुभव गाठीशी असल्याने भारतीय संघाला यूएईच्या भूमीवर चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीकडे टीम इंडियाच्या मार्गदर्शकाची भूमिका सोपवली आहे. त्यामुळे त्याचा अनुभव टीम इंडियाच्या कामी येणार आहे.
‘महेंद्रसिंग धोनी एक यशस्वी कर्णधार आणि खेळाडू राहिला आहे. तो भारतीय संघाला चांगले मार्गदर्शन करू शकतो. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाने चांगले क्रिकेट खेळले आहे. मात्र, भारत अंतिम फेरीत आपली योजना योग्य पद्धतीने अवलंबताना दिसत नाही.
धोनीकडे अंतिम सामना जिंकण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवणे सोपे होईल. त्यामुळेच त्याला मार्गदर्शकाची जबाबदारी दिली आहे,’ असेही बट्टने सांगितले.