IND vs AUS 1st Test Day 2 : जडेजा-अक्षर पटेलची दमदार खेळी, भारताकडे भक्कम आघाडी | पुढारी

IND vs AUS 1st Test Day 2 : जडेजा-अक्षर पटेलची दमदार खेळी, भारताकडे भक्कम आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्णधार रोहित शर्माचे झुंझार शतक आणि त्यानंतर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी झळकवलेल्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 धावांची आघाडी घेतली आहे. याचबरोबर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाहुण्या कांगारूंवर वर्चस्व राखले. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 7 गडी गमावून 321 धावा केल्या आहेत.

कर्णधारपदाची खेळी खेळताना रोहितने 212 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 170 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने (102 चेंडूत नाबाद 52 धावा) तेवढीच भक्कम साथ दिली आणि भारताचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावली. दुस-या दिवसाअखेर दोघांमध्ये 185 चेंडूत 81 धावांची भागिदारी झाली.

तत्पूर्वी, नाइटवॉचमन म्हणून आलेल्या अश्विनने रोहित शर्माच्या साथीने दुसऱ्या दिवशी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दिवसाच्या पहिल्या तासात दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेट्ससाठी संघर्ष करायला भाग पादले. मात्र, ब्रेकनंतर मर्फीने 41 व्या षटकात अश्विनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अश्विनने 23 धावा केल्या. यानंतर मर्फीने कसोटी स्पेशलिस्ट मानल्या जाणा-या चेतेश्वर पुजारालाचा 44 व्या षटकात अडसर दूर करून भारताला मोठा धक्का दिला. उपाहारानंतर मर्फीची पुन्हा एकदा जादू पहायला मिळाली. त्याने कोहलीला बाद करून संघाला चौथे यश मिळवून दिले. त्यानंतर कसोटी प्रदार्पण करणारा सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. मात्र, निराशा केली. तो जास्त वेळ क्रीजवर उभा राहू शकला नाही आणि सूर्याला नॅथन लायनने 8 धावांवर क्लीन बोल्ड केले. यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 168 होती.

अशा पडझडीत रोहित शर्माने कर्णधार पदाला साजेशी खेळी केली आणि एक टोक जबाबदारीने सांभाळले. त्याला रविंद्र जडेजाने चांगली साथ दिली. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा रोहित आणि जडेजा क्रीजवर होते. त्यांनी संघाची धावसंख्या 226 पर्यंत पोहचवत अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. मात्र, चहापानानंतर रोहित शर्मा लगेचच बाद झाला. कमिन्सने त्याला क्लिन बोल्ड केले. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 130 चेंडूत 61 धावांची भागीदारी झाली.

दुसऱ्या दिवशी भारताने सहा विकेट गमावल्या. कांगारूंच्य्या टॉम मर्फीने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने पाच विकेट घेतल्या. तर नॅथन लिऑनला आणि कमिन्सला एक-एक विकेट मिळाली.

रोहित शर्माचे दमदार शतक

कर्णधार रोहित शर्माने झुंझार शतक झळकावले. रोहित शर्माचे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटच्‍या तिन्‍ही फॉर्मेटमधील हे ४३ वे शतक ठरले. तर कसोटी क्रिकेटमधील ९ वे शतक आहे. रोहितने यावर्षी २४ जानेवारीला न्‍यूझीलंड विरुद्ध शतक झळकावले होते. एकीकडे ऑस्‍ट्रेलियाचे फिरकीपटू मॅर्फी व नॅथन टीम इंडियाच्‍या दिग्‍गज फलंदाजांना चकवत असतानाच रोहित शर्माने उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत आपलं शतक पूर्ण केले. ( Rohit Sharma century ) आत्‍मविश्‍वासाने भरलेल्‍या या खेळीत १७१ चेंडूत त्‍याने १४ चौकार आणि २ षटकार फटकावले.

पहिल्या दिवस भारताचा

रविंद्र जडेजा (5 बळी) आणि आर अश्विन (3 बळी) यांच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची दाणादाण उडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने नागपूर कसोटीत आपली स्थिती मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 177 धावांत गारद झाल्यानंतर प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 77 धावा केल्या होत्‍या .

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रोहित आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात तीन चौकार मारून रोहितने आपले इरादे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाने चौथ्या षटकातच नॅथन लायनकडे चेंडू सोपवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र, पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकांमध्ये टॉड मर्फीने ऑस्ट्रेलियाला यश मिळवून दिले. त्याने राहुलची विकेट घेतली. राहुल 71 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. पहिल्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा रोहित ५६ धावांवर नाबाद होता.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने स्कॉट बोलंडला क्लीन बोल्ड करून कांगारू संघाचा डाव संपवला. बोलंडला आपले खातेही उघडता आले नाही. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्ब 31 धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही कांगारू फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तीन खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि अश्विनने तीन बळी घेतले. मोहम्मद शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला पायचित पकडले आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतरच्या पुढच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद लागोपाठ दुसरा झटका दिला. यावेळी कांगारूंची धावसंख्या 2 बाद 2 होती. यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला आणि उपाहारापर्यंत विकेट पडू दिली नाही.

उपाहारानंतर जडेजाने आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि 35 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंत लबुशेन आणि रॅनशो यांना बाद करून भारताला यश मिळवून दिले. लबुशेनला केएस भरतने यष्टीचीत केले, तर रॅनशो पायचित झाला. त्यानंतर जडेजाने 42 व्या षटकात स्टीव्ह स्मिथला बोल्ड करून भारताला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाच बाद 109 धावांवर होती. स्मिथने 37 धावा केल्या. यानंतर अश्विनने आघाडी घेतली आणि अॅलेक्स आणि कमिन्सला बाद केले. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जडेजाने पीटरला बाद केले. त्यानंतर अश्विनने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांवर संपवला.

हेही वाचा : 

 

Back to top button