India Vs Sri Lanka : भारत - श्रीलंका दरम्यान ‘या’ दहा दिग्गजांनी बनवल्या 'वनडे'मध्ये सर्वाधिक धावा
पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून टी २० मालिकेत त्याना २-१ अशा फरकाने पराभव पत्कारावा लागला आहे. आता लंकन संघ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी सज्ज झाला असून जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा संघ करेल. (India Vs Sri Lanka)
भारत श्रीलंका जसे पक्के शेजारी आहेत तसेच क्रिकेट मैदानावर ते एकमेकांना तगडी झुंज देतात. यांच्या दरम्यानच्या प्रत्येक मालिकेत भारताचा पगडा भारी वाटत असला तरी तसे नसते. श्रीलंका नेहमी भारताला कडवी झुंज देत आला आहे. दोन्ही संघातील खेळाडू देखील एकमेकांविरुद्ध अत्यंत चुरशीने आणि त्वेशाने लढतात. चला तर जाणून घेऊया एकमेकांविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघातील धुरंधर दिग्गजांनी किती धावा केल्या आहेत. (India Vs Sri Lanka)
सचिन तेंडूलकर
भारतातकडून जेव्हा खेळाडुंच्या सर्वाधिक धावांची चर्चा होते तेव्हा अर्थातच क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचे नाव प्रथम येते. भारतातकडून या महान फलंदाजांनी सर्वच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा बनवल्या आहेत. यामध्ये श्रीलंका संघाचा सुद्धा समावेश होतो. भारत श्रीलंका दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सचिन तेंडूलकरने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर ठेवला आहे. श्रीलंके विरुद्ध सचिनने ८४ एक दिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४३.८४ च्या सरासरीने तब्बल ३३१३ धावा केल्या आहे. या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ८७.५४ इतका राहिला असून श्रीलंके विरुद्धचा त्याचा सर्वाधिक स्कोर १३८ इतका आहे. (India Vs Sri Lanka)
सनथ जयसुर्या
भारत श्रीलंका दरम्यानच्या सामन्यांमध्ये सनथ जयसुर्या हा नेहमी डोकेदुखी ठरायचा. सलामी येत डावखुऱ्या जयसुर्याने नेहमी भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजीकर मोठी धावसंख्या उभारली आहे. त्याने भारता विरुद्ध ८९ सामने खेळत तब्बल २८९९ धावा बनवल्या आहेत. ३६.२३ ची सरासरी व ९६.९८ इतक्या स्ट्राईकरेटने त्याने या धावा जमवल्या. शिवाय भारता विरुद्ध त्याचा सर्वाधिक स्कोर हा तब्बल १८९ इतका आहे. (India Vs Sri Lanka)
कुमार संघकारा
या शैलीदार फलंदाजाने जगातील सर्व गोलंदाजांवर हुकमत गाजवत भारताविरुद्ध सुद्धा कायम दबाव राखून ठेवला. भारता विरुद्ध हा फलंदाज अधिक चुरशीने खेळायचा. भारताविरुद्ध ७६ सामने खेळत त्याने ३९.७० ची सरासरी अन ८१.६२ च्या स्ट्राईक रेटने २७०० धावा बनवल्या आहेत. या दरम्यान १३८ हा भारता विरुद्धचा सर्वाधिक स्कोर राहिला आहे. (India Vs Sri Lanka)
महिला जयवर्धने
श्रीलंकेच्या या महान क्रिकेटपटूने भारतासुद्धा अनेकवेळा घाम फोडला आहे. भारता विरुद्ध ८७ सामने खेळत ३५.०७ ची सरासरी व ७८.१५ च्या स्ट्राईकरेटने जयवर्धनेने २६६६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोर हा १२८ असा आहे.
महेंद्रसिंह धोनी
श्रीलंके भारत दरम्यान सर्वाधिक धावा बनणाऱ्यामध्ये पहिल्यास्थानावर सचिन आहे आणि त्यानंतर पाचव्या स्थानावर भारताचा सर्वात यशस्वी करर्णधार महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक लागतो. मधले तीन फलंदाच हे श्रीलंकेचे आहेत याचाच अर्थ श्रीलंका भारता विरुद्ध कशी खेळते किंवा खेळायची याचा प्रत्यय येतो. श्रीलंके विरुद्ध धोनीने ६७ एकदिवसीय सामन्यात तब्बल ६४.४० च्या सरासरीने व ९०.९ च्या स्ट्राईक रेटने २३८३ धावा बनवल्या. यात १८३ हा त्याचा लंकेविरुद्धचा सर्वाधिक स्कोर आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेत्तृत्वाखाली २०११ साली श्रीलंकेला विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभूत करुन दुसऱ्यांदा वर्ल्डकप घेण्याचा पराक्रम भारताने केला. या सामन्यात धोनीने महत्त्वाची खेळी करत ९१ धावा बनवत नाबाद राहिला आणि षटकार ठोकत धोनीस्टाईलने सामना जिंकला होता.
तिलकरत्ने दिलशान
श्रीलंकेच्या या आणखी एका सलामीवीराने भारताला नेहमी कोंडित पकडण्याचे काम केले. भारताविरुद्ध त्याने ७० सामने खेळत ३८.२२ च्या सरासरीने व ८९.२२ च्या स्ट्राईक रेटने २२५५ धावा जोडल्या आहेत. यात त्याने १६० धावांची सर्वोच्च कामगिरी बजावली आहे.
विराट कोहली
विराट कोहली हा कदाचित सचिन नंतर सर्वच संघाविरुद्ध अनेक विक्रम नोंदवणार फलंदाज ठरेल. भारत श्रीलंके दरम्यान सर्वाधिक धावा बनविणाऱ्यांच्या यादीत विराट सध्या ७ व्या स्थानी जरी असला तरी त्याच्या पुढे असणारे सर्व फलंदाज सध्या निवृत्त झाले आहेत व विराट अद्याप खेळत आहे. त्यामुळे विराट या यादीत आपले स्थान आणखी उंचावेल हे नक्की. विराटने लंकेविरुद्ध ४७ सामन्यात ६०.०० सरासरीने व ९०.६१ च्या स्ट्राईक रेटने २२२० धावा कुटल्या आहेत. यात त्याचा सर्वाधिक स्कोर हा १३९ इतका असून लंके विरुद्धच्या एका सामन्यात त्याने केवळ ८६ चेंडूत १३३ धावांची आक्रमक खेळी केली होती.
या सात दिग्गज फलंदाजां शिवाय भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने लंकेविरुद्ध ५३ सामन्यात ५०.९४ च्या सरासरीने आणि ७९.७७ स्ट्राईकने १८३४ धावा केल्या आहेत. यात त्याची लंकेविरुद्ध १११ इतक्या धावा केल्या आहेत. यानंतर श्रीलंकेचा महान खेळाडू अरविंद डिसिल्व्हा याने भारताविरुद्ध ३५.७२ च्या सरासरीने व ७७.९९ च्या स्ट्राईक रेटने १७८६ धावा केल्या आहेत. १९९६ सालचा वर्ल्डकप श्रीलंकेला मिळवून देण्यात या खेळाडूने सिंहाचा वाटा उचलला होता. या यादीत १० क्रमांकावर भारताचा आक्रम फलंदाज विरेंद्र सेहवाग याचा क्रमांक लागतो. त्याने लंके विरुद्ध ५५ सामने खेळत ३४.६७ च्या सरासरीने आणि ११०.१८ च्या स्ट्राईक रेटने १६९९ धावा ठोकल्या आहेत.
वरील सर्व १० महान फलंदाजांपैकी केवळ विराट कोहली हा एकमेक क्रिकेटपटू आहे, जो सध्या क्रिकेट खेळत आहे. सध्या सुरु होणाऱ्या श्रीलंके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो आणखी धावा करत या यादीतील इतर विक्रम आपल्या नावावर करण्याची नामीसंधी त्याच्याकडे आहे.
अधिक वाचा :