

India vs England Semi Final History Wankhede World Cup: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मोठी लढत होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 39 वर्षांनंतर या मैदानावर दोन्ही संघ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा वर्ल्ड कप सेमीफायनल सामना 1987 मध्ये खेळला गेला होता. त्या वेळी हा एकदिवसीय विश्वचषक होता, ज्याला ‘रिलायन्स वर्ल्ड कप’ म्हणून ओळखले जात होते.
त्या सामन्यात इंग्लंडच्या ग्रॅहम गूच यांनी शानदार शतक झळकावले होते. इंग्लंडने 6 विकेट गमावत 254 धावा काढल्या होत्या. भारत त्या वेळी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळत होता. मात्र भारतीय संघ 219 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.
टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक ठरले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघ दोन वेळा उपांत्य फेरीत भिडले आहेत.
2022 मध्ये अॅडलेड येथे झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारतावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला करत सामना एकतर्फी फिरवला होता. यानंतर इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून टी-20 विश्वचषक जिंकला.
2024 मध्ये जॉर्जटाउनच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारताला बदला घेण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. रोहित शर्माने 57 धावांची महत्त्वाची खेळी केली, तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनीही योगदान दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 103 धावांवर रोखले.
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेत भारताला 68 धावांनी विजय मिळवून दिला. पुढे भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत विश्वचषक जिंकला.
विशेष बाब म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल जिंकणाऱ्या संघाने पुढे जाऊन विश्वचषक जिंकला आहे. 2022 मध्ये इंग्लंड आणि 2024 मध्ये भारताने ही कामगिरी केली. यामुळे यंदाच्या सेमीफायनल सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने तीन सामने जिंकले, तर इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत. या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे मुंबईतील उपांत्य सामना अधिकच रोमांचक ठरणार असल्याचे मानले जात आहे. भारताला घरच्या मैदानाचा फायदा मिळू शकतो, तर इंग्लंडही पुन्हा इतिहास घडवण्याच्या प्रयत्नात असेल.