टी-२० वर्ल्डकपमधील पराभवानंतर मोठा बदल, द्रविड ऐवजी लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक | पुढारी

टी-२० वर्ल्डकपमधील पराभवानंतर मोठा बदल, द्रविड ऐवजी लक्ष्मण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बदलण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे मुख्य असणारे व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात येणार असून राहुल द्रविड यांना ब्रेक देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधील इंग्लंडकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर लगेच हा निर्णय घेण्यात आला आहे. लक्ष्मण यांनी याआधीही झिम्बाब्वे, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवशीय सामन्यांमध्ये टीमच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे.

भारतीय टीमचा 18 नोव्हेंबर पासून न्यूझीलंड दौरा आयोजित आहे. यासाठी टीम इंडियामध्ये आधीच काही बदल करण्यात आले होते. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, रवीचंद्रन अश्विन यांना या दौऱ्यासाठी रेस्ट देण्यात आली आहे. तसेच ऋषिकेश कानिटकर, साइराज बहुतुले यांना टीम मध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

या दौऱ्यामध्ये टी20 सामन्यांसाठी हार्दिक पंड्या कर्णधार असेल तर एकदिवशीय सामन्यांसाठी शिखर धावन टीमची धुरा सांभाळणार आहे. याचबरोबर 4 डिसेंबरपासून होणाऱ्या भारत-बांग्लादेश एकदिवशीय आणि कसोटी सामन्यांमध्ये पुनः कोहली, आश्विन आणि रोहित यांचे टीममध्ये कमबॅक होणार आहे.

टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात (IND vs ENG) नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ गडी गमावून १६९धावा केल्या. विराट कोहलीने ४० चेंडूत ५० धावा आणि हार्दिक पांड्याने ३३ चेंडूत ६३ धावा करत इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने १६षटकांत बिनबाद १७० धावा करून सामना जिंकला.

ॲडलेडमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा उपांत्य फेरीतून बाहेर पडली. आता १३ नोव्हेंबरला जेतेपदाच्या लढतीत इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. (IND vs ENG)

ॲडलेडमध्ये इंग्लंडने इतिहास रचला

एकही विकेट न गमावता आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर एकही विकेट न गमावता इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय आहे. एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी यावर्षी कराचीमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात बिनबाद २०३ धावांचे आव्हान पार केले होते. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. २०१६ मध्ये हॅमिल्टन येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी एकही विकेट न गमावता १७१ धावा करत सामन्यात विजय मिळवला होता. इंग्लंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हे ही नक्की वाचा 

Back to top button