T-20 world cup semifinal: भारताच्या पराभवामुळे 'सेमीफायनल'चे समीकरण बदलले, जाणून घ्या आता कोणत्या संघांना आहे संधी...
पुढारी ऑनलाईन डेस्क : T-20 world cup स्पर्धेत रविवारी (दि.३०) टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका संघाने पराभव केला. या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवल्याने सेमीफायनलला जाण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. .तर अन्य संघांनाही पुढे चाल करण्याची संधी मिळाली आहे. जाणून घेवूया आता कोणत्या संघांना सेमीफायनलपर्यंत ( T-20 world cup semifinal ) धडक मारण्याची संधी मिळाली आहे याविषयी…
सेमीफायनलसाठी कोणत्या संघाला अधिक संधी ?
रविवारी मिळालेल्या विजयामुळे ग्रुप-२मध्ये दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. दक्षिण आफ्रिका संघाने चारपैकी तीन सामने जिंकत पाच गुण मिळवले आहेत. पावसामुळे या संघाचा एक सामना वाया गेला होता. भारतीय संघ तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळत चार गुण मिळवत गुणतालिकेत दुसर्या स्थानी आहे. भारताचे रनरेट चांगला आहे. रनरेट खराब असल्याने बांगलादेशचा संघ चार गुण असूनही तिसर्या स्थानी आहे. भारताचे उर्वरीत दोन सामने हे बांगलादेश आणि झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहेत. त्यामुळे सेमीफायनल धडक मारण्याची भारताला मोठी संधी असल्याचे मानले जात आहे.
भारताचा २ नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध सामना आहे. यानंतर ६ नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचा झिम्बाब्वे विरुद्ध मैदानात उतरेल. तर दक्षिण आफ्रिकेचा ३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि ६ नोव्हेंबर रोजी नेदरलँड विरुद्ध सामना आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे पाकिस्तानला झटका
दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. कारण पाकिस्तानच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यातील दोन सामन्यात पराभव झाल्याने या संघाकडे केवळ दोन गुण आहेत. आता सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी पाकिस्तानला उर्वरीत दोन सामने जिंकावेच लागतील. त्याचबरोबरच या संघाचे भारतासह अन्य संघांच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे. जर बांगलादेश आणि झिम्बाव्वे संघाने भारताचा पराभव केला, तसेच दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानसह नेदरलँडने पराभव केला तरच पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
T-20 world cup semifinal : …तर बांगलादेश संघही सेमीफायनलच्या शर्यतीत
बांगलादेशने जर भारताचा पराभव केला तो हाही संघ सेमीफायनलच्या शर्यतीत येईल. २ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानने टीम इंडियाला पराभूत केले तर त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी होणार्या पाकिस्तान विरु्दध बांगलादेश यांच्यातील सामना नॉकआउट सारखाच होणार आहे.
भारत-बांगलादेश सामन्यानंतर होणार चित्र स्पष्ट
भारताने बांगलादेशला हरवले तसेच दक्षिण आफ्रिकानेही पाकिस्तानला पराभूत केले तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघाचा सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित होईल. तसेच या कामगिरीमुळे ग्रुप-२मधील अन्य चार संघ विश्वचषकातून बाहेर पडतील. त्यामुळेच आता २ नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध भारत सामन्याकडे पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा :
- Zimbabme Cricket : झिम्बाब्वेच्या खेळाडूंना मिळते इतके मानधन
- Virat Kohli : विराट स्वत:च्याच शॉटने हैरान, किंग कोहलीची गोल्डन रिॲक्शन व्हायरल (Video)
- Legends League Cricket : मैदानातच दोन दिग्गज क्रिकेटपटूमध्ये ‘राडा’ , जॉन्सनने दिला युसूफ पठाणला धक्का (पाहा व्हिडीओ )