Rohit Sharma | आशिया चषक २०२३ साठी टीम इंडिया जाणार का पाकिस्तानला? रोहित शर्माने दिले उत्तर | पुढारी

Rohit Sharma | आशिया चषक २०२३ साठी टीम इंडिया जाणार का पाकिस्तानला? रोहित शर्माने दिले उत्तर

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकात (T-20 World Cup) २३ ऑक्टोबरला (रविवारी) भारताचा सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे. मेलबर्न येथे होणार्‍या या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यादरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने महत्वाचे वक्तव्य केले आहे. ”आम्हाला माहित आहे की पाकची गोलंदाजी किती चांगली आहे. पण आमच्याकडे अनुभवी फलंदाज आहेत. २ प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना सामोरे जाणे चांगले आहे. आम्हाला माहित आहे की त्यांची गोलंदाजी आमच्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यासाठी आमचे फलंदाज तयार आहेत. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीवर चर्चा केली असून क्षेत्ररक्षणही महत्त्वाचे असल्याचे रोहित शर्माने म्हटले आहे.

दरम्यान, पुढील आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी खेळवू. अशी भूमिका आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटले आहे की सध्या आम्ही टी-२० विश्वचषकावर लक्ष केंद्रित केले आहे. कारण ते आमच्यासाठी महत्वाचे आहे. पुढे काय होईल याची चिंता नाही. बीसीसीआय त्यावर निर्णय घेईल. आम्ही उद्याच्या सामन्यासाठी चांगली तयारी कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमधील बाबर आझमच्या संघाने बाजी मारून इतिहास घडविला होता. पाकिस्तानने प्रथमच टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर विजय मिळवला. त्यानंतर आशिया चषक २०२२ मध्ये भारत – पाक यांच्यात दोन सामने झाले आणि हिशेब १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे मागच्या वर्ल्डकपच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आजही भारतीय संघ आतूर आहे. पण, हा सामना होण्याची शक्यता २० टक्केच आहे. कारण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

भारताचे सामने आता निश्चित झाले आहेत. सुरुवात उद्या (रविवारी) पाकिस्तानशी आहे. पाकिस्ताननंतर भारताचा सामना नेदरलँडशी २७ तारखेला होईल. ३० तारखेला द. आफ्रिका, २ नोव्हेंबरला बांगला देश आणि शेवटचा साखळी सामना हा ६ नोव्हेंबरला झिम्बाब्वेशी होईल. उपांत्य फेरी गाठायला खात्रीलायक मार्ग हा भारताला ५ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून असेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जर हा हाय व्होल्टेज सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक गुण मिळणार आहे. (India vs Pakistan)

हे ही वाचा :

Back to top button