IPL 2022 : मुंबईच्या पराभवाला जबाबदार ‘या’ गोलंदाजावर रोहित शर्मा नाराज! | पुढारी

IPL 2022 : मुंबईच्या पराभवाला जबाबदार ‘या’ गोलंदाजावर रोहित शर्मा नाराज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आयपीएलमधील (IPL 2022) सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते, कारण त्याने मुंबई इंडियन्सच्या संघाला एकदा नव्हे तर पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. रोहित शर्माच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या 14व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला केकेआरविरुद्धचा सामना जिंकता आला असता, पण डॅनियल सॅम्सने कर्णधार रोहित शर्माच्या आशा धुळीस मिळवल्या.

या सामन्यात पॅट कमिन्सने आक्रमक फलंदाजीचे अप्रतिम दर्शन घडवले. त्याने डॅनियल सॅम्सने फेकलेल्या १६ व्या षटकात ३५ धावा कुटल्या आणि याच षटकात केकेआरला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्सच्या नावावर आयपीएलचा सर्वात लाजिरवाणा विक्रम नोंदविला गेला आहे. सॅम्स आयपीएलमधील (IPL 2022) सर्वाधिक मार खाणारा खेळाडू ठरला. त्याने आपल्या षटकात चार षटकार आणि दोन चौकारांसह ३५ धावा दिल्या.

आयपीएलच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा देणा-या गोलंदाजांकडे एक नजर टाकूया.

धावा : गोलंदाज विरुद्ध संघ : वर्ष

३७ : पी परमेश्वरन विरुद्ध आरसीबी : २०११
३७ : हर्षल पटेल विरुद्ध सीएसके : २०२१
३५ : डेनियल सॅम्स विरुद्ध केकेआर : २०२२
३३ : रवि बोपारा विरुद्ध केकेआर : २०१०
३३ : परविंदर अवाना विरुद्ध सीएसके : २०१४

आयपीएल २०२२ ची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी खूपच खराब झाली आहे. या हंगामात संघामध्ये बदल करण्यात आला असून यामुळे संघ आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन बनवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा तिसरा सामना हरल्यानंतर रोहित शर्माने इंस्टाग्रामवर आपल्या संघासाठी आणि मुंबईच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश लिहिला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई संघाचा एक फोटो शेअर करत रोहितने लिहिले की, ‘आम्ही नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात एकत्र होतो. ही आमची सर्वात मोठी ताकद आहे.’

या हंगामात मुंबईला त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २३ धावांनी मात केली. आता केकेआर विरुद्धचा तिसरा सामना गमावल्यानंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत सीएसके (CSK) पेक्षाही खाली ९व्या स्थानावर पोहोचला आहे.

मुंबई इंडियन्स संघ ९ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांचा पुढील सामना खेळणार आहे आणि त्यांना तो सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. अन्यथा त्यांच्यासाठी पुढील वाटचाल आणखी कठीण होईल. आता पुढील सामन्यात रोहित आणि कंपनी कोणत्या रणनीतीने आणि किती बदलांसह मैदानात उतरतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

Back to top button