Rohit Sharma : टीम इंडियाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत रोहित शर्माचे मोठे विधान, म्हणाला.. | पुढारी

Rohit Sharma : टीम इंडियाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत रोहित शर्माचे मोठे विधान, म्हणाला..

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बुधवारी पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे आगामी काळात नेतृत्वाच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे म्हटले. त्याच्या या विधानाची क्रिकेट वर्तृळात चर्चा सुरू झाली आहे.

तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार असल्याचा मला अभिमान : रोहित

नुकतेच रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतू तो पहिल्यांदाच या फॉरमॅटच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. टी 20, वनडे यानंतर आता कसोटी संघाचा कर्णधार बनल्यानंतर हिटमॅनने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, ‘तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार बनणे हा मोठा सन्मान आहे आणि ही खूप मोठी भावना आहे. सध्या आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मला कसोटीत कर्णधारपदाची संधी मिळाली, ज्याचा मला आनंद आहे.’

बुमराह, राहुल आणि पंत हे संघाचे भविष्यातील नेतृत्व…

जसप्रीत बुमराहला श्रीलंका टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्यावर रोहितने (Rohit Sharma) आपले मत व्यक्तकेले. तो म्हणाला, ‘संघाचा उपकर्णधार फलंदाज असो की गोलंदाज याने काही फरक पडत नाही. क्रिकेट हा माइंड गेम आहे आणि बुमराह त्यात माहीर आहेच. मी त्याला चांगल्याप्रकारे ओळखतो. तो कशाप्रकारे माइंड गेम खेळतो हे मला माहीत आहे.’

रोहित पुढे म्हणाला; बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल बोलायचे झाले तर या लोकांना भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. हे तीन खेळाडू आगामी काळात संघाच्या नेतृत्वासाठी प्रमुख दावेदार असतील, असा दावही त्याने यावेळी केला.

सॅमसनमध्ये उत्तम प्रतिभा….

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसन फिट आहे. त्याच्या पुनरागमनावर रोहितने (Rohit Sharma) प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, संजू सॅमसनमध्ये अतुलनीय प्रतिभा आहे. त्याची फलंदाजी पाहताना तुम्हाला मजा येईल. सॅमसनकडे कौशल्ये आहेत, प्रतिभा त्याच्यात ठासून भरलेली आहे, फक्त त्याला सामन्यात खेळवणे गरजेचे आहे. भारतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती मैदानावर दाखवणे, असेही त्याने सांगितले.

‘सॅमसनची बॅकफूट येत अचूक फटका मारण्याची शैली अप्रतिम आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. संजू जे शॉट्स खेळतो ते खेळणे खूप अवघड असते. अशा फलंदाजाची ऑस्ट्रेलियातील मैदानांवर गरज आहे. आशा आहे की तो त्याच्या प्रतिभेचा वापर करेल, असंही मत रोहितने व्यक्त केले.

कशी असेल टीम इंडियाची मिडल ऑर्डर…

जेव्हा रोहित शर्माला भारतीय संघाच्या मधल्या फळीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘मी सध्या याबद्दल विचार करत नाही. टी 20 विश्वचषकापूर्वी आम्हाला बरेच सामने खेळायचे आहेत आणि आमचे लक्ष सध्याच्या मालिकेवर आहे,’ असे त्याने स्पष्ट केले.

सूर्यकुमार यादवची दुखापत हा चिंतेचा विषय…

हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे सूर्यकुमार यादव श्रीलंका मालिकेतून बाहेर पडला आहे. तो बाहेर पडल्यावर हिटमॅन म्हणाला, ‘सुर्या संघातून बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का आहे. मला त्याच्याबद्दल वाईट वाटते, पण या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. सुर्या जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण अनेक खेळाडू संधीची वाट पाहत आहेत.’

रोहित म्हणाला, ‘तरुण खेळाडूंना कामगिरी करताना पाहणे ही खूप आनंदाची बाब आहे, पण आमचे वरिष्ठ खेळाडूही फिट रहावेत असे मला नेहमीच वाटते. मी त्या टप्प्यातून गेलो आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की पुनरागम करणे सोपे नाही.’

Back to top button