Team India : सहा वर्षांनंतर टीम इंडियाने केला 'हा' पराक्रम ; विराटने केले नाही 'ते' रोहितने करुन दाखवले
पुढारी ऑनलाईन डेस्क
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) वन डे पाठोपाठ वेस्ट इंडिजला टी-20 मालिकेतही ३-० असा व्हाईट वॉश दिला. या दमदार कामगिरीमुळे आयसीसी टी-20 रॅकिंगमध्ये टीम इंडिया नंबर वन झाली आहे. तब्बल सहा वर्षांनंतर भारतीय संघाने हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. यानंतर आता रोहित शर्मा यांच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे.
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंड संघ पहिल्या क्रमांकावर होता. इंग्लंडचे गुण २६९ होते. आता टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा सलग तीन सामन्यांमध्ये पराभव करत इंग्लंडला पिछाडीवर टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.
Team India : धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बनली हाेती नंबर वन
भारतीय क्रिकेट संघ हा महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली १२ फेब्रुवारी २०१६ ते ३ मे २०१६ या कालावधीत टी-२० फॉर्मटमध्ये नंबर एक स्थानावर होता. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडने पराभव केला होता. यानंतर अफगाणिस्तान, नामीबिया आणि स्कॉटलंडबरोबरील सामन्यात भारताचा विजय झाला होता. यानंतर भारताने टी-20 स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहली हा कर्णधार पदावरुन पायउतार झाला. संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आले. यानंतर याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडला टी-20 मालिकेत ३-० असा व्हाईट वॉश दिला. यानंतर वेस्टइंडिज विरुद्धचेही तिन्ही सामने जिंकले. यामुळे आता टी-20 फॉर्मेटमध्ये टीम इंडिया नंबर वन झाली आहे.
आता श्रीलंकेविरुद्ध मालिका
टी -20 फॉर्मेटमध्ये टीम इंडियाने सलग ९ सामने जिंकले आहेत. आता भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. भारतीय संघ श्रीलंकेविरोधात टी-२० मालिकेत तीन सामने खेळणार आहे. पहिला सामना २४ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे होणार असून, २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुसरा व तिसरा सामना होणार आहे.
हेही वाचलं का?
- बेळगाव : जनावरांच्या बाजारात पावणेदोन कोटींची उलाढाल : पंढरपुरी, गवळट, गुजर जातीच्या जनावरांना मागणी
- अँजेलिनावर ब्रॅडचा फसवणुकीचा आरोप
- सातारा जिल्हा आपल्याला भगवा करायचाय, आदित्य ठाकरे यांची शेखर गोरेंना साद