![तुझेच मी गीत गात आहे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2FCapture-351.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. निरागस स्वराजची गाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची धडपड आणि स्वराजला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळतपणे मदत करणाला मल्हार कामत प्रेक्षकांना भावतोय. या मालिकेच्या नवरात्री विशेष भागात मल्हार आणि स्वराजमधला असाच एक भावनिक क्षण अनुभवायला मिळणार आहे. मुंबईतल्या सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात याचं शूट पार पडलं आहे.
आजवर या मंदिरात कोणत्याही मालिकेचं अथवा सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच तुझेच मी गीत गात आहे मालिकेचं शूटिंग या मंदिरात होणार आहे.
देवीला दिव्यांची आरास अतिशय प्रिय आहे. तिन्ही सांजेला संपूर्ण मंदिर दिव्यांच्या लखलखाटाने उजळून जातं. योगायोगाने तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या या विशेष भागातही स्वराज आणि मल्हार दिव्यांची आरास करण्याचा सीन शूट करण्यात आलाय.
विशेष बाब म्हणजे या भागात स्वराजची आई आणि मल्हारची पत्नी म्हणजेच अभिनेत्री उर्मिला कोठारेचेही खास सीन असणार आहेत. मल्हारच्या आठवणींमध्ये त्याची आई कायम असते. याच आठवणींच्या सीनमधून उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.