

Shakti Kapoor fake death news
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या अफवांना पूर्णविराम देत खुद्द शक्ती कपूर यांनी समोर येत आपण पूर्णपणे ठणठणीत असल्याचे सांगितले. केवळ स्पष्टीकरण देऊन न थांबता, अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात आता कायदेशीर कारवाईचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सोशल मीडियावर आपल्या निधनाच्या बातम्या पाहून शक्ती कपूर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधला. "नमस्कार, माझ्या निधनाबाबतच्या ज्या बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. मी पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहे. कृपया अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करा," असे आवाहन त्यांनी या व्हिडिओमध्ये केले आहे. तसेच, खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात आपण सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शक्ती कपूर यांनी व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एका युजरने "टायगर अभी जिंदा है" अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने "तुम्ही बॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट कॉमेडियन आहात, लोक अशा बातम्या का पसरवतात?" असा सवाल करत आपला रोष व्यक्त केला.
शक्ती कपूर यांनी गेल्या ४० वर्षांत जवळपास ७०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. खलनायक आणि विनोदी अभिनेता अशा दोन्ही भूमिका त्यांनी गाजवल्या आहेत. 'राजा बाबू', 'बाप नंबरी बेटा दस नंबरी', 'अंदाज अपना अपना', 'चालबाज' आणि 'हंगामा' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
शक्ती कपूर यांनी शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी विवाह केला असून त्यांना श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर ही दोन मुले आहेत. श्रद्धा कपूर सध्या आपल्या 'स्त्री २' च्या यशानंतर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. विशेष म्हणजे, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' या चित्रपटात श्रद्धा झळकणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. 'मॅडॉक फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा बिग बजेट चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.