

Thalapathy Vijay Trisha Krishnan Tamil Nadu Politics: तमिळ सुपरस्टार विजयच्या राजकीय प्रवेशाने तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकत राज्यात मोठं यश मिळवलं. आता विजय मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच आणखी एक मोठी चर्चा रंगू लागली आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णन लवकरच राजकारणात प्रवेश करू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीत विजयने चेन्नईतील पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट या दोन मतदारसंघांतून विजय मिळवला. मात्र, नियमानुसार एका नेत्याला दोन जागा कायम ठेवता येत नाहीत. त्यामुळे त्याला 14 दिवसांच्या आत एक जागा सोडावी लागणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय पेरंबूर मतदारसंघ कायम ठेवण्याच्या विचारात आहे. कारण त्या ठिकाणी त्याला मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला आहे. त्यामुळे तिरुचिरापल्ली ईस्ट जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर TVK पक्षातील काही नेत्यांनी त्रिशा कृष्णनला पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पक्षाला वाटतं की त्रिशाची लोकप्रियता पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.
मात्र, त्रिशा सध्या राजकारणात उतरण्याबाबत फार उत्सुक नसल्याचं सांगितलं जात आहे. तिचा आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध आलेला नाही. त्यामुळे ती या निर्णयाबाबत विचार करत असल्याची माहिती आहे.
तमिळनाडू विधानसभा 234 सदस्यांची असून बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे. TVK ला 108 जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी आणखी काही आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
राजकीय वर्तुळात आता विजय कोणासोबत युती करणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही अहवालांनुसार, DMK सोबत युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. DMK ला 59 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे AIADMK सोबतही समीकरण जुळू शकतं, अशी चर्चा रंगली आहे. AIADMK कडे 47 जागा आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार, विजयने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना पत्र लिहून सरकार स्थापनेची संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. सोशल मीडियावरही विजयच्या संभाव्य शपथविधीबाबत चर्चा सुरू असून, त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.
जर त्रिशा कृष्णन प्रत्यक्षात निवडणूक लढवणार असेल, तर तो तिच्या करिअरमधील मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. दुसरीकडे, विजयही चित्रपटसृष्टीनंतर आता राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी काही दिवसांत तमिळनाडूच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.