Rupali Bhosle | ठाण्यातील रस्त्याच्या दुरावस्थेवर रुपाली संतापली; म्हणाली, ''१२ तास शुटिंगनंतर २ तासांचा त्रासदायक प्रवास''
Rupali Bhosle shared video bad road in thane
मुंबई - लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आलीय. 'आई कुठे काय करते' या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी रुपाली हिने रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रुपाली ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो घोडबंदर रस्त्याचा आहे. तिने या व्हिडिओच्या माध्यमातून भयावह अवस्था दाखवली आहे आणि आपल्या संताप व्यक्त केला आहे.
व्हिडिओमध्ये रुपाली भोसले काय म्हणते?
रुपाली म्हणते, ''ज्या रस्त्याला अर्धा तास लागतो, त्या रस्त्यावरती तुम्हाला दोन तास लागताहेत. याला रस्ता म्हणायचा का? काय अवस्था आहे या घोडबंदर रोडची? वाईट बेकार...''
रुपालीने रात्रीचे शुटिंग संपवून सकाळी ५:३० वाजता घराकडे निघाली. मात्र, तिला रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अर्धा तासांचे अंतर तब्बल २ तास कापावे लागले. आधी घोडबंदर रोडवर प्रचंड ट्रॅफिक आणि त्यात रस्त्यावर पडलेली खडी, खड्डे अशी वाईट अवस्था. या व्हिडिओमध्ये तिने रस्त्याची अवस्था दाखवलीय.
रुपालीने पोस्टमध्ये काय लिहिलं?
काय अवस्था आहे किती वर्ष झाली हा असा प्रवास करायचा? ५ वर्ष आई कुठे काय करतेच्या वेळी मी विरारहून यायचे तेव्हा सुद्धा हे असंच होत आणि आज सुद्धा. रात्रभर शुट करून सकाळी ५.३० ला घरी निघाले तर ह्या घोडबंदरला आधी ट्रॅफिक मग हा सुंदर रस्ता… १२/१४ तास शुट मग २ तास हा असा प्रवास कधी होणार हे नीट??
घोडबंदर रोड हा मुंबई आणि ठाणे शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, पावसाळ्यात या रस्त्याची चाळण झालेली दिसते. कलाकार असो वा सामान्य नागरिक सर्वांनाच याला सामोरे जावे लागत आहे. रुपालीला येत असलेला अनुभव तिने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. तिची पोस्ट व्हायरल होत असून कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया पाऊस पडतोय.
काय म्हणाले नेटकरी?
नेटकऱ्यांनी यावर खट्याळ, मिश्कील, विनोदी, टीकात्मक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलीय. एका नेटकऱ्याने म्हटले-लाडकी लाडका रस्ता. आणखी एकाने म्हटले- We have lost faith No solution for this road. जड वाहनांना दुसरा मार्ग पण देत नाहीत, वैताग आलेला आहे अगदी. का मते द्यायची?
दुसऱ्याने कमेंट्मध्ये लिहिलंय-सरकार कोणती पण असू द्या परिस्थिती हीच राहणार. आणखी काही कमेंट्स पाहा- इतक घाबरून चालत नसतय... ''ठाण्याचे रोड लडाख पेक्षा भयानक आहेत.''
''ताई नाही होणार. कितीही कोणी पाय उचलले किंवा हात चालवले किंवा डोकं चालवलं तरी काहीही परिणाम होणार नाही हा रस्ता चार-पाच वर्ष नाही अजून पाच दहा वर्षे सुद्धा असेच राहू शकतो किंवा काम जरी केले तरी तो तसाच होणार. यामध्ये गरीब माणूस किंवा श्रीमंत माणूस सुद्धा हदबल आहे. त्याचे कारण फक्त आणि फक्त भारताचे सिस्टीम आणि काही जनता सुद्धा जबाबदार आहे. नेते लोक फक्त खिसे भरायला आहेत पिढ्या आणि पिढ्या.''

