

महेश टिळेकर यांनी एका मुलाखतीत अभिनेत्रींच्या वागणुकीबद्दल बोलताना अश्विनी भावे यांनी कार्यक्रमासाठी संपर्क करूनही प्रतिसाद दिला नाही, असा दावा केला. तर दुसरीकडे विद्या बालनने आदराने वागणूक दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वात नवी चर्चा सुरू झाली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या वागणुकीबद्दल काही अनुभव शेअर केले आहेत. विशेषतः अभिनेत्री अश्विनी भावे आणि बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांच्या वागणुकीबद्दल त्यांनी उघडपणे सांगितले.
महेश टिळेकर यांनी सांगितले की, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. साऊथचे प्रसिद्ध विनोदी अभिनेते ब्रह्मानंदम, अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच अभिनेते असरानी हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. अशोक सराफ यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री अश्विनी भावे यांनीही कार्यक्रमाला यावे, अशी आयोजकांची इच्छा होती. कारण, टिळेकरांच्या एका पुस्तकाच्या इव्हेंटला त्या उपस्थित होत्या.
टिळेकरांनी दावा केला की, यासाठी अश्विनी भावे यांना फोन आणि मेसेजद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दोन दिवसांनी त्यांच्या मॅनेजरचा फोन आल्याचेही त्यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना टिळेकर म्हणाले की, 'मला मॅडमशीच बोलायचं आहे.' टिळेकर या वागणुकीवर संतापले. मुलाखतीत त्य़ांनी सांगितलं की, ''जर तुम्ही मॅनेजरमार्फत बोलत असाल तर आम्हालाही ॲटिट्यूड दाखवता आला असता.''
महेश टिळेकर यांनी मराठी सिनेसृष्टीतील मॅनेजर संस्कृतीवर भाष्य केले. ही मॅनेजर संस्कृती सिनेसृष्टीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी आणखी एक अनुभव सांगितला. ‘उमराव जान’च्या काळात अश्विनी भावे यांनी ओळख दाखवली नाही, असे त्यांनी म्हटले. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनबद्दल बोलताना त्यांनी तिचे कौतुक केले. विद्या बालनने नेहमी आदराने वागणूक दिली आणि साधेपणाने संवाद साधला, असे त्यांनी नमूद केले. टिळेकरांनी हेदेखील आवर्जुन सांगितलं की, ते विद्या बालनला फक्त एकदाच भेटले होते.
टिळेकर म्हणाले की, 'आधीही कलाकार चित्रपटात काम करायचे, तेव्हा वर्षा उसगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी थेट ॲप्रोच केलं. त्यांनी कधीच सांगितलं नाही की, मॅनेंजरशी बोला.'
एका नवोदित कलाकाराने देखील टिळेकरांना मॅनेंजरशी बोलायला सांगितलं होतं. तेव्हा टिळेकरांनी त्याला अजिबात काम दिलं नाही. 'आता तो कलाकार नाटकात काम करतो. तर नाटकासाठी मॅनेंजर घेऊन फिरत असेल का,' असा उपरोधिक टोला टिळेकरांनी लगावला.