

पेला अर्धा भरलेला असला तर ... तो अर्धा भरलेला आहे.... असं म्हणायचं... की अर्धा रिकामा . हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर, भावनेवर अवंलबून असतं... घडणाऱ्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन, मते वेगवेगळी असतात... त्यामुळेच त्या गोष्टीचे, घटनेचे वेगवेगळे अर्थ, पैलू प्रत्येक जण लावत असतात... हे आपल्याकडे पुराणकाळापासून चालत आलेले आहे, त्यातूनच अनेक गोष्टी,दंतकथांचा जन्म झाला आहे.... अशाच सृजनपूर गावात घडलेल्या मायाची गोष्ट सांगणारा ‘बोल बोल राणी....
पत्रकार - लेखक असलेला आभास (सुबोध भावे) पतीच्या खुनाचा आरोप असलेल्या मायाच्या (सई ताम्हणकर) आयुष्याचा परामर्श घेण्यासाठी सृजनपूरात येतो. तिच्या नावापासून दूर पळणाऱ्या गावात आभासला मायाच्या आयुष्याबद्दल सांगणारे राऊड्या (धनंजय सरदेशपांडे), किसना (पद्मनाभ बिंद ) आणि गांधारी (माधुरी भारती) भेटतात.
मात्र या तिघांनी त्यांच्या चष्म्यातून मायाचे जग चितारले आहे. त्यामुळे मायाच्या आयुष्यातलं नेमकं खरं काय....खोटं काय... हे मायाला.... मायाच्या नवऱ्याला (चिन्मय मांडलेकर) आणि तिच्या आयुष्यातल्या तिसऱ्या पुरुषाला ( ससाणे) ठाऊक या निष्कर्षावर चित्रपटाचा दी एन्ड होतो...या तिघांनी रेखाटलेल्या मायाची कथा चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखी आहे.
भालचंद्र सुळे यांच्या आणखी एक नारायण निकम यांच्या प्रायोगिक नाटकावर बेतलेला हा चित्रपट आहे.दिग्दर्शक सिड विंचूरकर यांनी दिग्दर्शनात प्रायोगिक बाज राखण्याचा प्रयत्न केला आहे. तमाशा कलावंत, गृहिणी आणि नंतर बिनधास्त वृत्तीनं जगणाऱ्या मायाच्या भूमिकेतील सगळ्या छटा सई ताम्हणकर व्यक्तिरेखांना न्याय देत साकारल्या आहेत.
चिन्मय मांडलेकर यांनी उन्मत्त अंहकारी पुरुष, कवी आणि सत्शील पतीच्या भूमिकेला न्याय दिला आहे. मोजक्या दृश्यात सामावलेल्या आभासच्या भूमिकेला सुबोध भावे यांनी ठसा उमटवला आहे, पण आणखी वाव दिला असता तर राणीच्या आयुष्याचा पट आणखी उलगडण्यास मदत झाली असती. प्रकाशयोजनेच्या तंत्राने मायेच्या आयुष्यातील प्रसंग आणखीनच बोलके केले आहेत. गाणी आणि संगीत प्रसंगाला अनुरूप आहेत..
मात्र आगीत काय जळालं.... हे राखेलाच ठाऊक असतं... या मायाच्या संवादाची हरवलेली गूढता प्रेक्षकांनी रिकाम्या जागा भरून आपआपल्या दृष्टिकोनातून हे अतर्क्य गूढ उकलण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर सोपविण्यात आली आहे.