

अभिनेते अनुपम खेर यांनी 'श्री राम भूमी' चित्रपटाच्या अयोध्येतील चित्रीकरणानंतर सोशल मीडियावर भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत. 'मनाचा एक कोपरा अयोध्येतच राहिला' असे म्हणत त्यांनी प्रभू श्रीरामाच्या नगरीत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
Anupam Kher wrote emotional note after first schedule of film Shri Ram Bhoomi shooting
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अयोध्येतील त्यांच्या आगामी 'श्री राम भूमी' (Shri Ram Bhoomi) या चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केले. या पवित्र ठिकाणी वेळ घालवल्यानंतर त्यांनी एक भावूक संदेश इन्स्टाग्रामवर लिहिला आहे. अयोध्येचे वर्णन केवळ एक शहर नाही, तर एक अनुभव असे त्यांनी करत त्य़ाठिकाणी मनाचा एक हिस्सा राहिल्याचे म्हटले आहे.
अनुपम खेर यांनी ‘श्रीराम भूमी’ या आगामी चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल संपल्यानंतर अयोध्येतील फोटो शेअर केले आहेत. अयोध्येतील खूप भावूक अनुभव त्यांनी फोटो पोस्टच्या माध्यमातून शब्दबद्ध केले आहेत. तेथून परतत असले तरी आपल्या मनाचा एक भाग अयोध्येतच राहिल्याची भावना व्यक्त केली.
खेर यांनी म्हटले की, अयोध्येतून ते केवळ सुंदर आठवणी घेऊन परतत नाहीत, तर सनातन परंपरेची अधिक सखोल जाण, अध्यात्मिक समृद्धी आणि इतिहास तसेच श्रद्धा यांना प्रामाणिकपणे पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमानही सोबत घेऊन जात आहेत.
अयोध्या ही केवळ एक शहर नसून ती एक अनुभूती असल्याचे सांगत त्यांनी तेथील वातावरणाचे विशेष कौतुक केले. शहरातील प्रत्येक गल्ली, मंदिर आणि परिसरात श्रीरामनामाचा अनुभव येत असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दर्शन, स्थानिक लोकांचे प्रेम आणि त्या पवित्र भूमीतील सकारात्मक ऊर्जा यामुळे केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही आपण अधिक समृद्ध झाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
यावेळी अनुपम खेर यांनी अयोध्येतील नागरिकांचे, आशीर्वाद देणाऱ्या संतांचे, मित्र यतींद्र आणि मंजरी मिश्रा यांचे तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक कामाख्या, छायाचित्रण दिग्दर्शक असीम बजाज आणि संपूर्ण युनिटचे मनापासून आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.
पोस्टच्या शेवटी त्यांनी 'धन्यवाद अयोध्या, पुन्हा भेटू' असा भावनिक निरोप देत "जय श्रीराम" असा जयघोष केला.