

'करुप्पू'च्या यशाबद्दल आमिर खानने सूर्याला संदेश पाठवला असून चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्रिशा कृष्णन आणि सूयार्ची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींची कमाई करत विजयच्या 'वारिसू'ला मागे टाकले आहे. आरजे बालाजी दिग्दर्शित आणि सूर्या- त्रिशा कृष्णन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'करुप्पू' या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा वेगाने ओलांडला आहे.तसेच अनेक सेलिब्रिटींकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आरजे बालाजीचा, सूर्या आणि तृषा कृष्णन यांची प्रमुख भूमिका असलेला 'करुप्पू' हा चित्रपट जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई करणारा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ चित्रपटांपैकी एक बनला आहे. या चित्रपटाच्या यशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या टीमशी संपर्क साधला होता आणि त्यामध्ये आमिर खानचाही समावेश झाला आहे, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक-अभिनेते आरजे बालाजी यांनी दिली.
बॉक्स ऑफिसवरील कामगिरी आणि विक्रम
१५ मे रोजी प्रदर्शित झाल्यापासून 'करुप्पू'ने प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचून आणले आहे. चित्रपट समीक्षकांच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने विजय आणि रश्मिका मंदान्ना यांच्या २०२३ मधील गाजलेल्या 'वारिसू' चित्रपटाच्या एकूण २९७.५५ कोटींच्या कमाईला मागे टाकले आहे. या यशाची अधिकृत घोषणा दिग्दर्शक आरजे बालाजीने शुक्रवारी सोशल मीडियावर "#Karuppu ३०० नाबाद" अशी पोस्ट लिहून केली. आता हा चित्रपट शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी यांच्या 'अमरन' चित्रपटाच्या ३३३.६७ कोटींच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
एकीकडे करुप्पूचे यश आणि दुसरीकडे दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव, यानंतर मनोरंजन सृष्टीतील अनेक मोठ्या नावांनी चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले आहे. यामध्ये बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान यांचाही समावेश आहे. दिग्दर्शक आरजे बालाजीने एका मुलाखतीत सांगितले की, आमिर खानने सूर्याला वैयक्तिक संदेश पाठवून चित्रपटाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि सूर्याने तो खास संदेश बालाजीला फॉरवर्ड केला.
तसेच, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही आरजे बालाजीला फोन करून त्यांचे कौतुक केले. रजनीकांत आपल्या खास शैलीत म्हणाले, "बालाजी, सुपर! तू हे साध्य करून दाखवलंस. किती जबरदस्त हिट ठरला आहे हा चित्रपट!" याव्यतिरिक्त अभिनेता सिलंबरसन टीआर (सिंबू) आणि अनेक दिग्गज दिग्दर्शकांनीही चित्रपटाच्या टीमशी संपर्क साधून शुभेच्छा दिल्या आहेत.
करुप्पूची कथा
कथा आणि भूमिकेचे स्वरूप 'करुप्पू' हा चित्रपट एका रक्षक देवतेच्या कथेवर आधारित आहे. या कथेत ही देवता न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी एका वकिलाच्या रूपात मानवी अवतार धारण करते. चित्रपटात सूर्याने 'करुप्पूस्वामी' तर त्रिशा कृष्णनने 'प्रीती' नावाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे दिग्दर्शक आरजे बालाजी स्वतः या चित्रपटात 'बेबी कन्नन' या खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत.