'रमा राघव' मालिकेतील निखिल दामले शेअर केले अनुभव
पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील रमा राघव मालिका प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पैजेवर जग जिंकणारी ‘रमा’ आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा ‘राघव’ यांची खट्याळ जोडी सगळयांच्या पसंतीस उतरत आहे. संस्कार, संस्कृती, परिश्रम याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं याची शिकवण अंगी भिनलेल्या राघवचे पात्र निखिल दामले साकारत आहे.
रमाचे पात्र ऐश्वर्या साकारत आहे. मालिकेतील या दोघांमधील तिखट नोकझोक आणि खट्याळ भांडण बघायला मिळत आहे. निखिल दामले याबद्दल बोलताना त्याने काही अनुभव सांगितले. तो म्हणाला ,”या मालिकेची प्रोसेस खूपच इंट्रेस्टींग होती. मला जेव्हा या भूमिकेची विचारणा झाली तेव्हा त्यात मला अस्खलित श्लोक, पल्लेदार संवाद म्हणायचे होते आणि यावरून मला अंदाज आला की माझं पात्र काय असू शकतं.
देवा धर्माचं करणारा, आदर्श मुलगा आणि त्यानुसार मी तयारी करायला सुरुवात केली. पहिले मला वाटलं एखाद दोन श्लोक असतील मग होऊन जाईल आरामात करू शकू. लहानपणापासून मला श्लोक म्हणायची सवय आई-बाबांमुळे लावली होती. मालिकेच्या एका सीनमध्ये मला खूप मोठा श्लोक म्हणायचा होता मी म्हंटला देखील पण मला कुठेतरी वाटत होतं की मी अजून छान करु शकतो. मला असं कळलं कि तो सिन करप्ट झाला आणि तो सिन पुन्हा शूट करण्याची संधी मला मिळाली आणि जेव्हा रिशूट केला तेव्हा मला आनंद झाला मला असं वाटतं देवाने ऐकले माझे.
पालखीचा action pack सिन शूट करताना खूप तयारी करावी लागली कारण मी प्रथमच मी असं काही शूट करत होतो. हार्नेसचा सिन शूट करत असताना मी जरा अनक्मपर्टेबल होतो. कारण माझी ती पहिलीच वेळ होती आणि तो करत असताना अपघात होताहोता वाचला. कारण मला रमाने म्हणजेच ऐश्वर्याने वाचवले. जेव्हा मी तो सिन पाहिला तेव्हा अक्षरश: माझ्या अंगावर काटा आला.”